कोल्हापूर : सतत धो धो कोसळणाऱ्या पावसाची गती पाणलोट क्षेत्रात कायम असल्याने धरणातील पाणीसाठा वाढत चालला आहे. पंचगंगा नदी शनिवारी ४३ फूट या धोका पातळीपेक्षा साडेचार फूट उंचीवरून वाहत आहे. नागरी, व्यापारी भागात पुराचे पाणी आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतूक कोलमडली आहे.

दरम्यान, राधानगरी धरणाचा कोणताच दरवाजा खुला न झाल्यामुळे नदीकाठी काहीसा दिलासा मिळाला असला तरी धोका कायम आहे. काल सायंकाळी पंचगंगा नदीची पाणी पातळी ४५ फूट ५ इंच होती. मुसळधार पावसामुळे त्यात दिवसभरात दोन फूट वाढ होवून शनिवारी पाच वाजता ती ४७ फूट ७ इंच इतकी झाली होती. ४३ फूट या धोका पातळीपेक्षा नदी साडेचार फूट उंचीवरून वाहत आहे. यामुळे नदीचे पाणी नागरी भागात आणखी पसरले आहे. शिवाय, व्हिनस कॉर्नर, कुंभार गल्ली, शाहूपुरी या व्यापारी भागातील अनेक दुकाने पाण्याखाली गेल्याने बंद राहिली. तसेच
पंचगंगा नदीचे पाणी पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा मार्गावर आले आहे. यामुळे कोल्हापूर सांगली मार्गावरील दुकाने पाण्यात बुडाली आहेत. पाणीपातळी वाढल्यास हा महामार्ग कोणत्याही क्षणी पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – कोल्हापूर जिल्ह्यात नऊ नद्या धोका पातळीवर

एनडीआरएफची आणखी एक तुकडी जिल्ह्यात दाखल झाली असून पूरबाधित गावांमध्ये नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नद्यांच्या काठावरील अनेक गावे पुराने बाधित झाली आहेत. सुमारे सात हजारांहून अधिक पूरबाधित नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. तर सव्वातीन हजार जनावरांनाही हलवण्यात आले आहे.

पंचगंगा नदीचे पाणी पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा मार्गावर आले आहे. यामुळे कोल्हापूर -सांगली मार्गावरील दुकाने पाण्यात बुडाली आहेत.

हेही वाचा – रिलायन्स जिओकडून ३५० कोटींची जीबी डेटा फसवणूक; राजू शेट्टी यांचा खळबळजनक आरोप

अतिवृष्टीचा जिल्ह्यातील वाहतुकीलाही फटका बसला आहे, जिल्ह्यातील ९६ बंधारे अद्यापही पाण्याखाली असल्यानं यामुळे जिल्ह्यातील २४ राज्य मार्ग, १२३ प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक सध्या पूर्णपणे ठप्प झाली आहे.