कोल्हापूर : भोगावती नदीच्या पाणीपातळीमध्ये घट झाल्याने बालिंगा पाणी उपसा केंद्र पूर्णतः बंद झाले आहे. यामुळे बुधवारी निम्म्या कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठा बंद झाला. अनेक भागांतील नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागले. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. यामुळे नदी, धरणातील पाणी पातळी नेहमीपेक्षा कमी आहे. भोगावती नदीतील पाणी पातळीत घट झाली आहे. यामुळे बालिंगा उपसा केंद्राचा भोगावती नदीतून उपसा बंद करावा लागला आहे.
नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ व्हावी याकरिता कोल्हापूर महापालिकेच्या जल विभागाकडून पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला गेला आहे. मध्यरात्रीनंतर पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. उद्या उपसा सुरू होईल, पण दाब कमी असेल. परवा दिवशीपासून पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे जल अभियंता जयेश जाधव यांनी सांगितले.
टँकरने पाणीपुरवठा

बालिंगा उपसा केंद्राचा पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे राजारामपुरीसह परिसरातील पाणीपुरवठा खंडित झाला आहे. निम्म्या शहराला पाणीपुरवठ्याची झळ बसली आहे. या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आतापासूनच कोल्हापूरकरांवर आली आहे.
हेही वाचा – विद्यार्थी २०२४ च्या निवडणुकीत दिवे लावतील; अजितदादांना खरमरीत प्रत्युत्तर
ग्रामीण भागालाही फटका
भोगावती नदीची पाणी पातळी कमी झाल्याने करवीर तालुक्यातील पाच ते सहा गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. कमी प्रमाणात पाणी उपसा होत आहे. यामुळे पाणी वितरण खंडित, अपुऱ्या दाबाने होत आहे.