कोल्हापूर : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्यात १ जुलै पासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. पुसद जि. यवतमाळ येथून या आंदोलनाची सुरूवात करणार असून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू, असा इशारा देखील शेट्टी यांनी दिला. ते बारामती येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या समारोप बैठकीत बोलत होते. यावेळी संघटनेची नव्याने बांधणी करू, असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले की, राज्य सरकारने शेतकर्यांवर वरवंटा फिरवू नये. तातडीने एफआरपी व भूमिअधिग्रहण कायद्यातील केलेली दुरूस्ती मागे घ्यावी. दूध उत्पादकांची लूट सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर कमी होऊ लागले आहेत. राज्य सरकारने तातडीने दूध उत्पादक शेतकर्यांना प्रतिलिटर ७ रूपये अनुदान खात्यावर वर्ग करावे, अन्यथा १० जुलै रोजी १ दिवसाचे दूध बंद आंदोलन करू. शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. महायुती व महाविकास आघाडीचे शेतकऱ्यांवरील प्रेम हे निवडणुकीपुरतेच होते. निवडणुका संपल्या व त्यांची गरज संपली. त्यांनी पुन्हा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

आणखी वाचा-महाराष्ट्र केसरीसाठी डोपींग चाचणी होणार, नुरा कुस्तीला रामराम; वस्ताद पैलवान गोलमेज परिषदेत निर्णय

एक जुलै पासून राज्यव्यापी दौरा

एक जुलै पासून मी राज्यव्यापी दौरा काढून पुन्हा नव्याने आंदोलन सुरू करत आहे. शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांची लग्ने होताना अडचणी येत आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे लग्ने होत नाहीत. त्यासाठी सरकारने ५ लाख रूपये स्त्री धन म्हणून द्यावे. तसेच नवविवाहित जोडप्यांना स्वंयरोजगारासाठी २५ लाख रूपयांचे कर्ज वाटप करावे, अशी आमची मागणी आहे. महाविकास आघाडीने निवडणुकीत यश मिळाले म्हणून हुरळून जाऊ नये. भावनेच्या लाटेवर स्वार होऊन निवडणुकीत मिळालेले यश अल्पकाळ असते. यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न मिटले नाहीत. प्रश्न जैसे थेच आहेत. गद्दार व निष्ठावतांच्या लढाईत शेतकरी गुदमरला आहे.

थकीत वीज बिलासाठी एकही कनेक्शन कट करू नये, बोगस वीज बिले आमच्या माथी मारू नयेत. अव्वाच्या सव्वा दराने वीज आकारणी करून जादाची वीज बिले कृषीपंपाची दिली आहेत. आम्ही काय गुन्हेगार नाही. शेतीची वीज बिले माफ करावीत. १० पट पाणी वाढीचा निर्णय तातडीने रद्द करून जलसंपदा नियमन लागू केलेला मागे घ्यावा. शेतकरी कधी पाण्याची उधळपट्टी करत नाही. आम्ही ठराव केले आहेत ते सरकारपर्यंत पोहचवू, सरकारने म्हणणे ऐकले तर ठीक नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देखील शेट्टी यांनी दिला.

आणखी वाचा-कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात दोन दुचाकींची जोरदार धडक; एकजण जागीच ठार, तिघे गंभीर जखमी

स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील म्हणाले की, निवडणुका आम्ही स्वबळावर लढलो. आम्ही स्वस्थ बसणार नाही. पुन्हा उठू व लढू. यावेळी सतिश काकडे, संदीप जगताप, प्रकाश पोपळे, राजेंद्र गड्ड्यान्नावर, प्रकाश बालवाडकर, अनिल पवार, अमर कदम, दामोदर इंगोले, किशोर ढगे, प्रशांत डिक्कर, प्रभाकर बांगर, जनार्दन पाटील, पोपट मोरे, बापू कारंडे, संदीप राजोबा, महेश डुके आदी उपस्थित होते.