|| दयानंद लिपारे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंचगंगा शुद्धीकरणाचा जागर अभियान

प्रदूषणासंदर्भात मार्गदर्शक सूचनांची पूर्तता केल्यासंबंधीचा अहवाल विहित कालावधीत सादर केला नसल्याने राष्ट्रीय हरित लवादाने  कोल्हापूर महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रत्येकी पाच लाखांचा दंड केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी नगरपालिका, साखर कारखाने, कापड प्रक्रिया उद्योग यांच्याकडून नदी प्रदूषणाची तीव्रता वाढतच चालली आहे. पर्यावरण मंत्री, उच्च न्यायालय, राष्ट्रीय हरित लवाद, विभागीय आयुक्त यांनी कानउघाडणी करूनही पंचगंगा प्रदूषणाचे अस ओझे घेऊ न वाहत आहे. नदी प्रदूषणाविरोधात सातत्याने आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते आणि पंचगंगा शुद्धीकरणाचा जागर मांडणारे अभियान याद्वारे नदी प्रदूषणाला अंकुश बसताना दिसत आहे. अशा जनचळवळींना पाठबळ मिळण्याची गरज भासत आहे. शुक्रवारी सुरु झालेल्या लोकचळवळीतूनच प्रभावी दिशादर्शन होण्याची चिन्हे आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यला पावसाचे वरदान, भरपूर धरणे, पाण्याची मुबलकता. या साऱ्या जलवैशिष्टय़ांमुळे पाण्याचा बेसुमार आणि बेधुंद वापरही वाढला. परिणामी स्वच्छ पंचगंगा नदी प्रदूषित झाली. सर्वप्रकारच्या प्रदूषणामुळे नदीचे संपूर्ण अस्तित्वच झाकोळले गेले आहे. सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगेचा समावेश झाला. त्यावर उपाययोजना शोधल्या गेल्या. मात्र, गेली तीन दशके पंचगंगा नदीच्या प्रदूषणाची तीव्रता वाढत आहे. शासन, प्रशासन, न्यायालय यांच्याकडून संबंधित यंत्रणेचे वारंवार कान टोचले गेले, तरीही पंचगंगेचे गटारीकरण थांबले नाही. नदीच्या प्रदूषणाविरोधात केवळ आवाज न उठवता काही कृतिशील कार्यक्रम राबवला जावा, अशी अपेक्षा सुजाण नागरिकांकडून व्यक्त होत राहिली. शुRवारी पंचगंगा काठी सुरु झालेला नदी प्रदूषणाचा जागर यादृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे.

कोल्हापूर , इचलकरंजी आणि नदीकाठच्या ८४ गावांची जीवनदायिनी असलेली पंचगंगा स्वच्छ आणि निर्मळ व्हावी, यासाठी मी प्रदूषण करणार नाही आणि कोणाला प्रदूषण करु देणार नाही, असा निर्धार  माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी आज पंचगंगा नदीला साक्षी ठेवत केला. पंचगंगा प्रदूषण मुक्ती निर्धार समितीच्यावतीने राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमात  निर्धार समितीचे कार्यकर्ते, परिसरातील अनेक नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, शेतकरी व महिला सहभागी झाल्या होत्या. या लोकचळवळीकडे केवळ उपक्रमशीलता म्हणून न पाहता पंचगंगा शुद्धीकरणाचा एल्गार ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रदूषण, रेंगाळलेली कार्यवाही आणि इशारे

पंचगंगा नदी प्रदूषणाची तीव्रता तीन दशके कायम आहे. नदी प्रदूषणामुळे सन २०१२ मध्ये इचलकरंजी शहरात कावीळ साथ उद्भवली, त्यामध्ये तीसहून अधिक लोकांना प्राण गमवावा लागला. यावर उच्च न्यायालयाने आदेश देऊ नही अद्यापही कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी नगरपालिका, कापड प्रक्रिया उद्योग (प्रोसेसर्स), साखर कारखाने, अन्य उद्योग आणि नदीकाठची गावे यांच्याकडून परिपूर्ण अंमलबजावणी झालेली नाही. अंमलबजावणीचे नाटक मात्र रंगवले जात असल्याने कार्यवाहीचे दावे पर्यावरण अभ्यासकांनाही मान्य नाहीत. फेब्रुवारी महिन्यात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंत्रालयात ‘कोल्हापूर जिल्ह्यतील कृष्णा पंचगंगा नदी प्रदूषणास जबाबदार असणाऱ्यां घटकांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा’, असा आदेश दिला. तर या महिन्याच्या सुरुवातीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी कोल्हापुरात ‘पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्व कार्यान्वित यंत्रणांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काटेकोरपणे समयबद्ध कामे करावीत, हयगय करणाऱ्यांची गय केली जाणार नाही’, असा इशारा दिला. शासन प्रशासन यांच्याबरोबरीने नदी प्रदूषण दूर करण्यासाठी सजग नागरिकही पुढे सरसावले असून पंचगंगा प्रदूषणमुक्त जागर छेडला आहे.

झिरो लिक्वि ड डिस्चार्ज प्रकल्प

पंचगंगा नदी प्रदूषणात सर्वाधिक प्रदूषित करणारा घटक म्हणून कापड प्रक्रिया उद्योगाकडे पाहिले जाते. प्रोसेसच्या रासायनिक सांडपाण्यामुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले. त्यावर मार्ग काढण्यासाठी गेल्या दशकात केंद्र शासनाच्या इचलकरंजी टेक्सटाईल डेव्हलपमेंट क्लस्टर योजनेतून १२ दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेचा प्रकल्प साकारला गेला. हा प्रकल्प अपुरा पडू लागल्याने आणि पर्यावरण विषयक नियम अधिक प्रभावी ठरल्याने आता नवा प्रकल्प करणे भाग पडले आहे. भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणींवर उपाययोजना म्हणून प्रोसेसमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रRिया करुन पाणी प्रदूषणमुक्त होण्यासाठी अत्याधुनिक ‘झिरो लिक्विड डिस्चार्ज  (झेडएलडी) प्रकल्पाची गरज आहे. या योजनेमुळे प्रक्रियेनंतर ९०  टक्के सांडपाण्याचा पुनर्वापर होणार आहे. २० एमएलडी प्रकल्पासाठी सुमारे ९० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून ७५ टक्के अनुदान शासनाकडून मिळणार आहे,  असे प्रकल्पाचे संकल्पक प्रकाश आवाडे यांनी सांगितले.

याचवेळी त्यांनी पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा जागर प्रतीकात्मक न राहता तो कायमस्वरूपी आणि उपाययोजनाबद्ध उपक्रम ठरेल, असे ‘लोकसत्ता’ला सांगितले. तर, नदी प्रदूषणमुक्ती उपक्रमात सहभागी झालेले विश्व हिंदू परिषदेचे संघटक पंढरीनाथ ठाणेकर यांनी, हा अराजकीय मंच असून नदी प्रदूषणावर मात करण्यासाठी जनतेचे सक्रिय योगदान दिले जाणार आहे, असे नमूद केले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water pollution in kolhapur
Show comments