कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून केली. शक्तीपीठ जोडण्यासाठी हा महामार्ग आहे की इलेक्ट्रॉल बॉण्ड घेणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरसाठी आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

२७ हजार एकर सुपीक जमिनीतून हा महामार्ग जाणार असल्याने, शेतकऱ्यांच्या जमिनीचे मोठे नुकसान होणार आहे. शक्तीपीठ महामार्ग व्हावा अशी कोणाचीही, मागणी नसून कॉन्ट्रॅक्टरांच्या हिताचा हा महामार्ग आहे. यातील हूजुर कोण आहे. असा घणाघात त्यांनी केला. विरोधी सदस्यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले

शक्तीपीठ महामार्ग विरोधात आमदार सतेज पाटील यांनी आक्रमकपणे, विधान परिषदेत लक्षवेधी भूमिका मांडली. या महामार्गाला केवळ स्थगिती नको तर हा महामार्ग रद्द करा अशी मागणीही त्यांनी विधान परिषदेत केली. शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा हा महामार्ग आहे.

आणखी वाचा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ; पावसाची उघडझाप

७ फेब्रुवारी २०२४ ला या महामार्गाची आखणी करण्यात आला. आणि २८ फेब्रुवारी २०२४ ला हा राज्य महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला. २० दिवसांमध्ये याची आखणी करून १२ हजार ५८९ गटातून हा महामार्ग जाणार असल्याचे सांगण्यात आले. वीस दिवसात अशा प्रकारे आखणी करुन ७ मार्च २०२४ ला भूसंपादनाची अधिसूचना काढण्यात येत असेल तर अधिकाऱ्यांना पुरस्कार द्यावा लागेल. असेही त्यांनी सांगितले. या राज्यामध्ये प्रकल्प पुर्ण ५० वर्ष झाले, तरीही त्या संदर्भातल्या पुनर्वसनाचे निर्णय प्रलंबित आहेत. मग एवढे घाई करून या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट कोणाला देण्यात येणार आहे. यासाठी हा रस्ता केला जातो काय ?असा सवालही आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा-अजित पवार गटाचे दोन बडे नेते शरद पवार यांच्या भेटीला; कोल्हापुरात खळबळ

नागपूर रत्नागिरी महामार्ग अस्तित्वात असताना आता नव्याने हा महामार्ग करण्याची गरज आहे काय? वर्धा जिल्हातून हा महामार्ग सुरु होत आहे. महात्मा गांधींच्या विचारांचा हा ऐतिहासिक जिल्हा गोव्याला कोणत्या हेतूने जोडला जाणार आहे. कुठली विचारसरणी यामागे आहे काय? शक्तीपीठ महामार्ग व्हावा यासाठी कोणाचीही मागणी नाही. कोल्हापूर रत्नागिरी हा महामार्ग गोव्याकडे गेला आहे. संकेश्वर मार्गे जाणारा मार्ग कोकणातून गोव्याला जोडणारा आहे. याशिवाय गगनबावड्यातूनही तळ कोकणाकडे जाणारा महामार्ग गोव्याला गेला आहे. त्याच्या भूसंपादनाला लोकांनी विरोध केलेला नाही. गोव्याकडे जाण्यासाठी समांतर आणि पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. पर्यायी मार्ग असताना केवळ, कॉन्ट्रॅक्टरांच्या हितासाठी हा रस्ता केला जात आहे. यातील, हुजूर कोण आहे? ते संबंधीत मंत्र्यांनी जाहीर करावे. असे आव्हानही आमदार सतेज पाटील यांनी केले.

या प्रश्नावर मंत्री दादा भुसे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण विरोधी आमदारांनी सरकार आणि शक्तीपीठ महामार्गा विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू ठेवली. मंत्री भुसे आपली बाजू तावातावाने मांडत होते, आणि विरोधी सदस्य घोषणा देत होते. त्यामुळे आ. नीलम गोऱ्हे यांनी कामकाज तहकूब केले.