कोल्हापूर : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक ते अंकली या महामार्गातील शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळाल्याशिवाय भुसंपादन करू देणार नाही. यामुळे याबाबतीत शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी; मगच मोजणीबाबत कार्यवाही करावी अशी ठाम भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत मांडली.

उदगाव येथे सोमवारी भूमिसंपादनासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी आले होते. पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांनी हे काम सुरू ठेवले होते. राष्ट्रीय महामार्गाच्या भूमी संपादनास विरोध असल्याचे शेतकऱ्यांनी प्रखरपणे स्पष्ट केले. तसेच, विविध प्रश्न उपस्थित करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. संपादीत जमिनीस चौपटीप्रमाणे मोबदला न देता पोलिसबळाचा वापर करून जबरदस्तीने मोजणी केल्यास जशास तसे उत्तर देवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला होता.

आणखी वाचा-कोल्हापुरातील तरुणाच्या खूनप्रकरणी सात आरोपींना १२ तासातच अटक

शेतकऱ्यांची थडगे बांधून विकास

त्यानंतर आज राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकारी येडगे यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करताना शेट्टी म्हणाले, विकास कामांना शेतकऱ्यांचा विरोध नाही. मात्र शेतकऱ्यांची थडगी बांधून विकास करता येणार नाही. प्रशासन व सरकार दोघेही वेळकाढूपणा करू लागल्याने हा प्रकल्प रखडू लागला आहे. महाविकास आघाडी सरकारने भूसंपादन कायदा बदलला यामुळे शेतकऱ्यांच्यी राखरांगोळी झाली. शेतकरी वारवांर चौपट मोबदल्यासाठी हेलपाटे मारूनही याबाबत शासनाकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. प्रशासनाकडून जबरदस्ती पोलिस बळाचा वापर करून मोजणीबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचेकडून कार्यवाही करण्यात येत आहे.

वाटणीपत्र नसताना मोजणी

भूमी अभिलेख विभागाकडून कोणतीही अद्यावत कागदपत्रे न तपासता तसेच संबधित शेतकऱ्यांना नोटीसही लागू न करता जुन्या कागदपत्राव्दारे मोजणी करण्याचे काम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हद्दी निश्चीती नसून वाटणीपत्र न झाल्याने मोजणी पुर्ण होण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत.

आणखी वाचा-प्रवाशांना दिलासा; अनुस्कुरा घाटातून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू

टोलमध्ये पार्टनरशिप द्या

अंकली ते चोकाक या भागातील शेतकऱ्यांना पुर्वीचा सांगली-कोल्हापूर महामार्ग, सांगली-कोल्हापूर बायपास रस्ता, रेल्वे लाईन, नवीन कोल्हापूर नागपूर रस्ता व शक्तीपीठ महामार्ग यामुळे शेकडो शेतकरी भूमिहीन होवू लागले आहेत. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी सरकारलस चौपट देता येत नसेल तर आम्हाला टोलमध्ये हिस्सा द्या किंवा जेवढी जमीन संपादित होणार आहे, तेवढी गावातीलच गायरान जमीन द्या अशी मागणी राजू शेट्टी यांनी यावेळी केली.

चौपट नुकसान भरपाईच्या शासनाच्या हालचाली

दरम्यान जिल्हाधिकारी यांनी यावेळी चौपट मोबदल्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असून शासनाने याबाबत निर्णय प्रलंबित ठेवला आहे. उर्वरीत जुन्या रस्त्यावरच भूसंपादन करणे व महापुरांचे ऊपाययोजना करणे यासारख्या गोष्टी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारनाने तातडीने जाहीर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या.