भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे(बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांची सोमवारी सुप्रीम कोर्टाने पदावरून हकालपट्टी केली. लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशी लागू करण्यास चालढकल केल्याप्रकरणी कोर्टाने अनुराग ठाकूर यांच्यावर कारवाई केली. याशिवाय, ठाकूर यांच्यावर सुप्रीम कोर्टात शपथपूर्वक खोटी साक्ष दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. कोर्टात खोटी साक्ष दिल्याप्रकरणी कारवाई का केली जाऊ नये? अशी कारणे दाखवा नोटीस देखील आज कोर्टाने अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांनी दिली आहे. खोटी साक्ष दिल्याचे नेमके प्रकरण काय? अनुराग ठाकूर यांनी वारंवार कोर्टाची दिशाभूल केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने १५ डिसेंबरला झालेल्या सुनावणीत चांगलेच फटकारले होते. लोढा समितीच्या शिफारशी टाळण्यासाठी अनुराग ठाकूर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) मदत मागितल्याचे समोर आले होते. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी हा बीसीसीआयच्या कारभारातला सरकारी हस्तक्षेप ठरतो, असे आयसीसीने बीसीसीआयला पत्राने कळवावे अशी विनंती ठाकूर यांनी आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर यांना केली होती. अनुराग ठाकूर यांनी सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपण अशी विनंती केल्याचे नाकारले होते. मात्र, आयसीसी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी लोढा समितीला लिहिलेल्या पत्रामुळे ठाकूर यांनी अशी विनंती केल्याचे स्पष्ट झाले होते. शशांक मनोहर यांच्या पत्रामुळे ठाकूर यांचे सत्य पुढे आले आणि न्यायमित्रांनी (अमायकस क्युरी) यांनी सुप्रीम कोर्टाकडे ठाकूर यांच्यावर खोटी साक्ष दिल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली. वाचा: सुप्रीम कोर्टाकडून अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांची 'विकेट', पदावरून हटवले