मागील वर्षी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पार पडलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेची आयसीसीने ‘अल्टीमेट टेस्ट सीरिज’ म्हणून निवड केली आहे. ऑनलाइन मतदान प्रक्रियेच्या आधारे ही निवड करण्यात आली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी आयसीसीने ही घोषणा केली. नव्या दमाच्या टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.

आयसीसीच्या म्हणण्यानुसार, या पुरस्कारासाठी १५ कसोटी मालिका शर्यतीत होत्या. त्यापैकी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील मालिकेला सर्वाधिक मते मिळाली. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेली कसोटी मालिका भारतासाठी खूप खास होती. टीम इंडियाला पहिल्याच सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यातील एका डावात टीम इंडिया ३६ धावांवर बाद झाली. शिवाय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली या कसोटीनंतर मायदेशी परतला होता.

हेही वाचा – ठरलं तर..! ‘ऐतिहासिक’ सामन्यासाठी ICCनं केली पंचांची निवड

हेही वाचा – WTC Final नंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना मिळणार ‘ब्रेक’, मजा-मस्ती करण्यासाठी असणार २० दिवस

यानंतर निम्म्याहून अधिक खेळाडू दुखापतींना सामोरे गेले. नव्या आणि युवा खेळाडूंना बलाढ्य ऑस्ट्रेलियासमोर मैदानात उतरावे लागले. ब्रिस्बेनमधील शेवटचा कसोटी सामना खूप महत्वाचा होता, जेथे भारतीय संघाने बर्‍याच वर्षानंतर ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव केला. अनेक दशके कांगारू संघाने येथे पराभव पाहिला नव्हता, परंतु टीम इंडियाने सामना जिंकून मालिका २-१ अशी ताब्यात घेतली.

आयसीसीने आपल्या वेबसाईटवर या कसोटी मालिकेच्या सामन्यांचे संक्षिप्त वर्णनही केले आहे.