आयसीसीने वर्षाच्या अखेरीस भारतात होणारा टी-२० वर्ल्डकप यूएई आणि ओमान येथे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.  भारतातील करोनाची स्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. आयसीसीच्या निर्णयामुळे बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे. हे सामने यूएईत होत असले, तरी बीसीसीआयकडून या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. १७ ऑक्टोबरपासून वर्ल्डकप टी-२० स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी होईल. या स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत. अबुधाबी, दुबई आणि शारजामध्ये वर्ल्डकपचे सामने खेळवले जातील.

करोनामुळे आयपीएलची उर्वरित स्पर्धाही यूएईत ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना १५ ऑक्टोबरला असणार आहे. त्यामुळे टी २० वर्ल्डकपपूर्वी खेळाडूंची चांगलीच दमछाक होणार आहे. याबाबतचे वृत्त ईएसपीएन क्रिकइन्फोने दिले.

 

हेही वाचा – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गमावलेल्या टीम इंडियासाठी सेहवाग बनला ‘कालीन भैय्या’!

ईएसपीएनच्या अहवालानुसार टी-२० वर्ल्डकप दोन फेऱ्यांमध्ये खेळला जाईल. पहिली फेरी यूएई आणि ओमानमध्ये होईल. या अहवालानुसार, राऊंड १ मध्ये १२ सामने होणार असून त्यामध्ये ८ संघ भिडणार आहेत. ८ पैकी ४ संघ सुपर १२ साठी पात्र ठरतील. सुपर १२ साठी बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी या संघांचा सामना होणार आहे.

सुपर १२ फेरीत ३० सामने होतील

अहवालानुसार सुपर १२ फेरीत एकूण ३० सामने होणार आहेत. ही फेरी २४ ऑक्टोबरपासून सुरू होईल. सुपर १२ फेरीत ६-६ संघांना दोन स्वतंत्र गटात विभागले जाईल. सुपर १२ नंतर ३ प्लेऑफ सामने, २ उपांत्य फेरी आणि अंतिम सामना होईल.