श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदविसीय सामन्यात भुवनेश्वर कुमार गोलंदाजीत उत्तम कामगिरीत करण्यात अपयशी ठरला, या सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. शिवाय तो बऱ्यापैकी महागडा ठरला. दुसर्‍या वनडेत मात्र त्याने अष्टपैलू कामगिरी केली. गोलंदाजीत त्याने तीन बळी घेतले आणि फलंदाजीत भारतासाठी विजयी योगदान दिले. पण त्याने यावेळी एक चूक केली. ही चूक त्याने सहा वर्षांनंतर केली.

सहसा गोलंदाज क्रिकेट सामन्यांत नो-बॉल टाकताना दिसतात. पण भुवनेश्वर कुमार हा बऱ्याच वेळा जास्त अवांतर धावा न देता किफायतशीर गोलंदाजी करतो. पण दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात त्याने श्रीलंकेविरूद्ध नो बॉल टाकला. जवळजवळ सहा वर्ष आणि ३०९३ चेंडूनंतर त्याने नो बॉल टाकला. भुवनेश्वर कुमारने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑक्टोबर २०१५मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अखेरचा नो बॉल टाकला होता.

या सामन्यात भुवनेश्वर कुमारने नो बॉल टाकला असला तरी तो तीन विकेट घेण्यास यशस्वी ठरला. टीम इंडियाच्या उप-कर्णधाराने चरित असलांका आणि अविष्का फर्नांडोच्या यांना बाद केले. या दोन्ही फलंदाजांनी अर्धशतक ठोकले आणि भुवीने त्यांना पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला. भुवीनेही दुश्मंता चामिराला बाद केले.

असा रंगला सामना

आघाडीच्या फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे भारतीय संघ पराभवाच्या छायेत असताना आठव्या क्रमांकावरील दीपक चहर (८२ चेंडूंत नाबाद ६९ धावा) पाहुण्यांसाठी तारणहार ठरला. गोलंदाजीत दोन बळी मिळवणाऱ्या चहरच्या अष्टपैलू योगदानामुळे भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर तीन गडी आणि पाच चेंडू राखून विजय मिळवला. चहरने भुवनेश्वर कुमारच्या साथीने आठव्या गडय़ासाठी ८४ धावांची अभेद्य भागीदारी रचली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.