इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताने दहा गडी राखून विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दुसऱ्याच दिवशी पाहुण्यांचा पराभव झाला. पहिल्या डावात इंग्लंडने ११२ तर भारताने १४५ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा डाव ८१ धावांत आटोपला आणि भारताला ४९ धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान सलामीवीर रोहित शर्मा (२५*) आणि शुबमन गिल (१५) यांनी सहज पूर्ण केले. या पराभवासोबतच इंग्लंडच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली.

Ind vs Eng: पहिल्यांदा नव्हे, दुसऱ्यांदा भारताने दोन दिवसांत जिंकली कसोटी

इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर संपुष्टात आला. तर दुसऱ्या डावात इंग्लंडला केवळ ८१ धावाच करता आल्या. दोन्ही डावात मिळून इंग्लंडने १९३ धावा केल्या. इंग्लंडच्या संघाचे दोन्ही डाव ज्या दिवशी सुरू झाले त्याच दिवशी संपले. अशा सुमार फलंदाजीमुळे इंग्लंडच्या संघाच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. कोणत्याही कसोटी सामन्यात ज्या दिवशी डाव सुरू झाला त्याच दिवशी संघ बाद होणे आणि दोन्ही डावात मिळून २०० धावांचा टप्पाही न ओलांडणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला.

WTC Finals: भारताच्या विजयामुळे इंग्लंड शर्यतीतून OUT; ‘असं’ असेल समीकरण

अशी रंगली तिसरी कसोटी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांत आटोपला. त्यात केवळ झॅक क्रॉलीने अर्धशतक केले. तर अक्षर पटेलने ३८ धावांत ६ बळी टिपले. त्यानंतर भारताचा पहिला डावही स्वस्तात संपला. रोहितच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताला कशीबशी १४५ धावांपर्यंत मजल मारणं शक्य झालं. कर्णधार जो रुटने अवघ्या ८ धावा देत ५ गडी टिपले. इंग्लंडचा दुसरा डावही लवकर संपुष्टात आला. अक्षरचे ५ तर अश्विनचे ४ बळी यांच्या जोरावर इंग्लंड ८१ धावांत गारद झाला. त्यानंतर चौथ्या डावात भारताने बिनबाद विजयासाठी आवश्यक असलेलं लक्ष्य गाठलं. सामन्यात ११ बळी टिपणारा अक्षर पटेल सामनावीर ठरला.