अखेरच्या षटकांत शार्दुल ठाकूरने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर सलग दुसऱ्या सामन्यात भारताने सुपरओव्हरवर विजय मिळवला आहे. वेलिंग्टनच्या मैदानावर भारताने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ निर्धारीत षटकांमध्ये १६५ धावांपर्यंतच मजल मारु शकला. यानंतर सुपरओव्हरमध्ये भारतीय संघाने पुन्हा एकदा १४ धावांचं आव्हान सहज पार करत विजय मिळवला. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली आहे. जसप्रीत बुमराहने सुपरओव्हरचं षटक टाकताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर चांगला अंकुश लावण्याचा प्रयत्न केला. टीम सेफर्टला माघारी धाडण्यात भारताला यशही आलं, तरीही मुनरो व इतर फलंदाजांनी फटकेबाजी करत भारतासमोर १४ धावांचं आव्हान ठेवलं. प्रत्युत्तरादाखल भारताकडून लोकेश राहुलने फटकेबाजी करत पहिल्या दोन चेंडूंमध्येच १० धावा केल्या. तिसऱ्या चेंडूवर फटकेबाजी करण्याच्या नादात राहुल माघारी परतला. मात्र विराट कोहलीने संजू सॅमसनच्या साथीने विजयी लक्ष्य पार करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी, मुंबईकर शार्दुल ठाकूरने अखेरच्या षटकांत केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने चौथा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. विजयासाठी १६६ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अखेरच्या षटकांत हाराकिरी केली. नवदीप सैनीने १९ वं तर शार्दुल ठाकूरने २० वं षटक भेदक मारा करत पुन्हा एकदा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. अर्धशतकवीर टीम सेफर्ट, रॉस टेलर यांना अखेरच्या षटकात माघारी धाडण्यामध्ये भारतीय गोलंदाजांना यश आलं. न्यूझीलंडकडून कॉलिन मुनरोने ६४ तर टीम सेफर्टने ५७ धावा केल्या. भारतीय संघाने गोलंदाजीत आश्वासक सुरुवात करत मार्टीन गप्टीलला माघारी धाडलं. मात्र यानंतर कॉलिन मुनरो आणि टीम सेफर्ट यांनी आक्रमक फटकेबाजी करत सूत्र आपल्या हाती घेतली. भारतीय गोलंदाजांवर चौफेर हल्लाबोल चढवत दोन्ही फलंदाजांनी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. यादरम्यान मुनरोने आपलं अर्धशतकही साजरं केलं. ही जोडी संघाला विजय मिळवून देणार असं वाटत असतानाच, मुनरो चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला. यानंतर लगेचच चहलने टॉम ब्रुसला माघारी धाडत न्यूझीलंडला धक्का दिला. अखेरच्या षटकांतमध्ये भारतीय गोलंदाज वरचढ होत असल्याचं दिसताच, टीम सेफर्टने पुन्हा एकदा फटकेबाजी करत सामन्यावर न्यूझीलंडचं वर्चस्व प्रस्थापित केलं. नवदीप सैनीने १९ व्या षटकात भेदक मारा करत सामन्याचा निकाल अखेरच्या षटकापर्यंत नेला. शार्दुल ठाकूरनेही अखेरच्या षटकात पहिल्याच चेंडूवर रॉस टेलरला माघारी धाडलं. यानंतर त्याच षटकात अर्धशतकवीर टीम सेफर्ट चोरटी धाव घेताना धावबाद झाला. यानंतर मिचेलही शार्दुलच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. अखेरच्या चेंडूत विजयासाठी दोन धावा असताना सँटनर धावबाद झाल्यामुळे सामना बरोबरीत सुटला. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना, मनिष पांडेचं नाबाद अर्धशतक आणि सलामीवीर लोकेश राहुलच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारताने चौथ्या टी-२० सामन्यात १६५ धावांपर्यंत मजल मारली आहे. मालिकेत विजयी आघाडी घेतल्यानंतर भारताने चौथ्या सामन्यात आपल्या महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली. मात्र हा प्रयोग पुरता फसला, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत भारतीय धावगतीला वेसण घातली. न्यूझीलंडकडून इश सोधीने आश्वासक मारा केला. भारताकडून मनिष पांडेने नाबाद ५० तर लोकेश राहुलने ३९ धावा केल्या. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघात संधी मिळालेल्या संजू सॅमसनने या सामन्यात पुन्हा एकदा निराशा केली. अवघ्या ८ धावा काढत कुगलेजनच्या गोलंदाजवर सॅमसन माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यरही ठराविक अंतराने माघारी परतले. सलामीवीर लोकेश राहुलने एक बाजू लावून धरत धावा जमवण्याचा प्रयत्न केला. शिवम दुबेच्या साथीने त्याने महत्वपूर्ण भागीदारीही केली, मात्र इश सोधीने त्यालाही माघारी धाडलं. यानंतर मधल्या फळीत मनिष पांडे आणि शार्दुल ठाकूर यांनी फटकेबाजी करत संघाला शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकापासून भारतीय फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधीच दिली नाही. विशेषकरुन इश सोधीने भारतीय फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवलं. शार्दुल ठाकूर अखेरच्या षटकांत माघारी परतल्यानंतर मनिष पांडेने तळातल्या फळीतल्या फलंदाजांना सोबत घेत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. न्यूझीलंडकडून फिरकीपटू इश सोधीने ३, हमिश बेनेटने २ तर टीम साऊदी-कुगलेजन आणि सँटनर यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.