भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या टी २० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत १४८ धावा केल्या. त्यात शिखर धवनने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. एकीकडे गडी बाद होत असताना त्याने खेळपट्टीवर चांगला जम बसवला. पण अखेर मैदानावर ऋषभ पंत आणि धवन यांच्यात धाव घेण्यावरून झालेल्या गोंधळामुळे तो बाद झाला. धवनने ३ चौकार आणि १ षटकार लगावत ४२ चेंडूत ४१ धावा केल्या. त्याआधी, भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्याच षटकात माघारी परतला. पहिल्या षटकाच्या पहिल्या पाच चेंडूत रोहितने दोन चौकार लगावले. पण शेवटच्या चेंडूवर मात्र तो पायचीत झाला. त्याने ५ चेंडूत ९ धावा केल्या. रोहित बाद झाल्यावर मैदानात आलेला लोकेश राहुल स्वस्तात माघारी परतला. चेंडूचा अंदाज न आल्याने त्याने मारलेला फटका थेट फिल्डरच्या हातात गेला आणि तो झेलबाद झाला. त्याने १७ चेंडूत १५ धावा केल्या. सुरुवातीपासूनच दमदार फटकेबाजी करणारा श्रेयस अय्यर मोठा फटका खेळताना बाद झाला. अमिनुल इस्लामच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना त्याचा सीमारेषेवर झेल टिपण्यात आला. त्याने १ चौकार आणि २ षटकारांसह १३ चेंडूत २२ धावा केल्या. भारतीय संघातून आपला पदार्पणाचा टी २० सामना खेळणारा मुंबईकर शिवम दुबेही केवळ एक धाव करून बाद झाला. गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूच्या उसळीचा अंदाज न आल्याने तो बाद झाला. दिल्लीकर ऋषभ पंत घरच्या मैदानावर फारशी कमाल करू शकला नाही. २६ चेंडूत ३ चौकार लगावत त्याने २७ धावा केल्या. डावाच्या शेवटच्या टप्प्यात मोठा फटका खेळताना तो झेलबाद झाला. भारतीय फलंदाजांना आपल्या गोलंदाजीत जखडून ठेवलेल्या बांगलादेशला शेवटच्या टप्प्यात गोलंदाजीत थोडासा मार खावा लागला. क्रुणाल पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी शेवटच्या टप्प्यात केलेल्या फलंदाजीच्या जोरावर भारताने २० षटकात ६ बाद १४८ धावा केल्या. पांड्या ८ चेंडूत १५ धावा , तर सुंदर ५ चेंडूत १४ धावा करून नाबाद राहिला. बांगलादेशकडून शफिउल आणि अमिनुल इस्लाम यांनी प्रत्येकी २-२ तर अफीफ होसेनने १ बळी टिपला.