भारतीय संघ सध्या क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हन संघाविरुद्ध चार दिवसांचा सराव सामना खेळत आहे. या सामन्यात भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३५८ धावा केल्या. भारताकडून पाच फलंदाजांनी अर्धशतके ठोकली पण त्या खेळीचे शतकात रूपांतर करण्यात साऱ्यांनाच अपयश आले. भारताचा डाव संपल्यानंतर प्रतिस्पर्धी संघ फलंदाजीला मैदानात आला आणि त्यावेळी एक विचित्र घटना घडली.

भारताकडून पहिले षटक मोहम्मद शमीने फेकले आणि सात धावा दिल्या. त्यानंतर वेगवान गोलंदाज उमेश यादव आपला पहिला चेंडू टाकण्यासाठी धावला. रन-अप घेऊन तो ज्यावेळी स्टंपच्याजवळ पोहोचला, तेव्हा त्याचा पाय घसरला आणि खेळपट्टीवरच त्याने लोटांगण घातले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेत उमेश यादवला संधी मिळालेली नव्हती, त्यामुळे त्याचा हा यंदाच्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरील पहिलाच अधिकृत चेंडू असणार होता. मात्र त्याच चेंडूवर त्याचा पाय घसरला आणि तो पडला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा व्हिडीओ ट्विट केला आहे.

त्याआधी वरुणराजाने हजेरी लावत सामन्याचा पहिल्या दिवसा खेळ वाया घालवला. दुसऱ्या दिवशी भारताकडून नवोदित पृथ्वी शॉ याने ६६, चेतेश्वर पुजाराने ५४, कोहलीने ६४, अजिंक्य रहाणेने ५८ आणि हनुमा विहारीने ५३ यांनी अर्धशतके झळकावली. अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ व्यतिरिक्त मुंबईकर रोहित शर्माने ४० धावांची खेळी केली. लोकेश राहुल पुन्हा एकदा आपल्या लौकीकास साजेशी खेळी करता आली नाही. तो तीन धावांवर बाद झाला. यष्टीरक्षक पंत अवघ्या ११ धावांवर बाद झाला.