देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला असताना आयपीएललाही त्याचा फटका बसला असून स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यानंतर बंगळुरुसोबत होणारा सामना पुढे ढकलावा लागला. दरम्यान चेन्नईच्याही तिघांना करोनाची लागण झाली आहे. त्यानंतर मंगळवारी हैदराबादचा वृद्धिमान साहा यालाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने स्पर्धा स्थगित करत असल्याचं जाहीर केलं आहे.

“सध्याच्या परिस्थितीत आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, पूर्ण रद्द केलेली नाही. काही दिवसांनंतर सर्व संबंधितांशी चर्चा करून, उर्वरित स्पर्धा घेता येईल का; कुठे व कशी घेता येईल आदीची चाचपणी केली जाईल,” असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.

बायो-बबलमध्येही करोनाने घुसखोरी केल्याने आयपीएलच्या पुढील सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यातच बीसीसीआय सर्व सामने मुंबईत खेळण्याची तयारी करत होतं. मात्र यादरम्यान हैदराबादच्या वृद्धिमान साहा याला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. हैदराबाद आणि मुंबईमध्ये आज दिल्लीत सामना होणार होता. खेळाडूंनाही करोनचाी लागण होत असल्याने अखेर बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

चेन्नईच्या तीन सदस्यांना करोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी बुधवारी राजस्थानविरोधात होणारा सामना आपण खेळू शकणार नसल्याचं बीसीसीआयला कळवलं होतं. जोपर्यंत पॉझिटिव्ह आढळलेल्या सदस्यांच्या संपर्कात आलेले सर्व खेळाडू तिन्ही चाचण्यांमध्ये निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत मैदानात उतरण्यास इच्छुक नसल्याचं चेन्नई संघाने बीसीसीआयला कळवलं होतं. नियमाप्रमाणे यासाठी सहा दिवसांचा कालावधी लागणार होता.

आयपीएलचे आतापर्यंत २९ सामने खेळले गेले आहेत. गुणतालिकेत दिल्लीचा संघ अव्वल स्थानी आहे. तर चेन्नई दुसऱ्या, बंगळुरु तिसऱ्या, मुंबई चौथ्या, राजस्थान पाचव्या, पंजाब सहाव्या, कोलकाता सातव्या आणि हैदराबादचा संघ आठव्या स्थानावर आहे.

बीसीसीआय आयपीएल मुंबईत हलवण्याच्या तयारीत होतं – 
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, बीसीसीआय आयपीएलचे उर्वरित सर्व सामने मुंबईत शिफ्ट करण्याचा विचार करत होतं. मुंबईतील वानखेडे, डी वाय पाटील आणि ब्रेबॉर्न या तीन मैदानांमध्ये हे सामने खेळवले जाणार होते.

मुंबई उच्च न्यायालयात याचिका
आयपीएलच्या पुढील सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असताना स्पर्धा रद्द करावी किंवा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मंगळवारी मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. करोना स्थितीमुळे आयपीएल स्पर्धा पुढे रद्द करण्यात यावी किंवा पुढे ढकलावी असा आदेश बीसीसीआयला द्यावा अशा मागणी याचिकेत करण्यात आली होती. तसंच आयपीएल स्पर्धा इतकी महत्वाची नसून खेळाडूंसाठी होणाऱ्या संसाधनांचा वापर करोना रुग्णांसाठी केला जाऊ शकतो असं याचिकाकर्त्याने म्हटलं होतं. मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी याप्रकरणी सुनावणी होणार होती. मात्र त्याआधीच स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

Live Blog

14:53 (IST)04 May 2021
हर्षा भोगले आणि डेल स्टेनचं ट्विट

14:16 (IST)04 May 2021
आयपीएलचं स्पष्टीकरण

आयपीएल आणि बीसीसीआयने तातडीने बैठक घेत आयपीएलचा सध्याचा हंगाम तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएलमध्ये सहभागी खेळाडू, सपोर्ट स्टाफ तसंच इतरांच्या सुरक्षेशी बीसीसीआय तडजोड करु इच्छित नाही. भागधारकांची सुरक्षा, आरोग्य लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. 

सध्या खूप कठीण काळ सुरु असून खासकरुन भारताला मोठा फटका बसला आहे. या काळात आम्ही  काही सकारात्मकता आणि आनंद देण्याचा प्रयत्न केला. पण आता स्पर्धा स्थगित करणं तसंच प्रत्येकाने आपल्या कुटुंबीयांकडे आणि प्रिय व्यक्तींकडे जाणं अत्यावश्यक आहे. 

आयपीएल २०२१ मध्ये सहभागी झालेल्या सर्वांत्या सुरक्षिततेसाठी तसंच सुरक्षित प्रवासाची व्यवस्था करण्यासाठी बीसीसीआय आपल्या सर्व अधिकारात प्रयत्न करेल.

या अत्यंत कठीण परिस्थितीतही आयपीएल २०२१ आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचारी, राज्य संघटना, खेळाडू, सहाय्यक कर्मचारी, फ्रँचायजी, प्रायोजक, भागीदार आणि सेवा पुरवणाऱ्यांचे बीसीसीआय आभार मानू इच्छित आहे.

14:11 (IST)04 May 2021
आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यामागची ही आहेत कारणं, वाचा...

करोनामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा अखेर स्थगित करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाचं सावट स्पर्धेवर घोंगावत होतं. मात्र एक एक करत करोनाची लागण खेळाडूंना होत गेली आणि बीसीसीआयला स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आयोजन करण्यापूर्वीच स्पर्धेवर करोनाची पडछाया होती. मात्र बायो बबलचं कारण देत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आयपीएल २०२१ या स्पर्धेला ९ एप्रिलला सुरुवात झाली होती. या स्पर्धेतील अजून ३१ सामने उरले होते. मात्र करोनाचं संकट पाहता ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. त्यामुळे आता टी २० विश्वचषकानंतर या स्पर्धेतील उर्वरित सामने खेळले जातील असं बोललं जात आहे. सविस्तर वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

14:10 (IST)04 May 2021
IPL स्थगित : बायो-बबल ते न्यायालयातील याचिका... कालपासून नक्की काय काय घडलं?; जाणून घ्या १० महत्वाचे मुद्दे

भारतामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. करोनाचा पटका आता आयपीएललाही बसला असून संपूर्ण स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय़ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने घेतला आहे. भारतामध्ये रोज साडेतीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत असतानाच दुसरीकडे बायो बबलच्या सुरक्षेमध्ये आयपीएलच्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र बायो-बबलचा हा फुगा सोमवारी फुटला आणि सोमवारी कोलकाता संघातील दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी क्लिक करा

14:05 (IST)04 May 2021
आयपीएलचं स्पष्टीकरण
13:44 (IST)04 May 2021
परिस्थिती हाताबाहेर गेली 

चेन्नईचे गोलंदाज प्रशिक्षक एल बालाजी यांना करोनाची लागण झाल्यानंतर बुधवारी चेन्नई आणि राजस्थानचा सामना पुढे ढकलावा लागला. त्यानंतर बीसीसीआयकडून आय़पीएल स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी कोलकाताचे खेळाडू संदीप वॉरियर आणि वरुण चक्रवर्ती पॉझिटिव्ह आढळल्यानंतर कोलकाचा आणि बंगळुरुमधील सामना पुढे ढकलावा लागला होता. त्यातच मंगळवारी हैदराबादचा वृद्धिमान साहा यालाही करोना असल्याचं निष्पन्न झालं.

13:39 (IST)04 May 2021
राजीव शुक्ला यांचं ट्विट

बीसीसीआयने आयपीएल सध्यापुरतं रद्द करण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. करोना स्थिती लक्षात घेता स्पर्धा पुन्हा कधी खेळवायची यासंबंधी निर्णय घेतला जाईल. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असं ट्विट बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी केलं आहे.

13:36 (IST)04 May 2021
मुंबई उच्च न्यायालयात याचिका

आयपीएलच्या पुढील सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असताना स्पर्धा रद्द करावी किंवा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मंगळवारी मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. करोना स्थितीमुळे आयपीएल स्पर्धा पुढे रद्द करण्यात यावी किंवा पुढे ढकलावी असा आदेश बीसीसीआयला द्यावा अशा मागणी याचिकेत करण्यात आली होती. तसंच आयपीएल स्पर्धा इतकी महत्वाची नसून खेळाडूंसाठी होणाऱ्या संसाधनांचा वापर करोना रुग्णांसाठी केला जाऊ शकतो असं याचिकाकर्त्याने म्हटलं होतं. मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी याप्रकरणी सुनावणी होणार होती. मात्र त्याआधीच स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

13:35 (IST)04 May 2021
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याकडून दुजोरा

आयपीएल स्पर्धा स्थगित करत असल्याच्या वृत्ताला बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही दुजोरा दिला आहे.

13:33 (IST)04 May 2021
आयपीएल स्थगित करत असल्याची बीसीसीआयकडून अधिकृत घोषणा