विराट कोहलीला आयपीएलमध्ये अपेक्षेइतके यश मिळाले नसले तरी इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी चॅम्पियन्स क्रिकेट स्पर्धेत तो चमक दाखवेल, असा विश्वास माजी कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केला. कपिल यांनी सांगितले, ‘विराटकडे असलेली क्षमता, नैपुण्य याची काळजी करू नये. आयपीएलमध्ये त्याला अपेक्षेइतक्या धावा करता आल्या नाहीत याचे कारण मला माहीत नाही. तथापि त्याच्या फॉर्मबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही. भारतीय संघाचा तो मुख्य आधारस्तंभ आहे. त्याच्या खेळामुळे अन्य सहकाऱ्यांना प्रेरणा मिळत असते. जेव्हा त्याला सूर सापडतो, तेव्हा त्याच्या सहकाऱ्यांकडूनही चांगली कामगिरी होते.’ गतविजेत्या भारताला चॅम्पियन्स स्पर्धेतील पहिल्या लढतीत चार जूनला पाकिस्तानबरोबर खेळावे लागणार आहे. कपिलदेव यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ मध्ये पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. जसप्रित बुमराह याच्या गोलंदाजीचे कौतुक करीत कपिल म्हणाले, ‘जसप्रित बुमराहच्या गोलंदाजीबाबत मला सुरुवातीला फारशी चमक जाणवली नव्हती. मात्र त्याने केलेली प्रगती खूपच समाधानकारक आहे. चेंडू टाकण्याबाबतची त्याची शैली फारशी आकर्षक नसली तरी टप्पा व दिशा ओळखून गोलंदाजी करण्याबाबत त्याने प्रभाव दाखविला आहे. तो यॉर्करही चांगल्या पद्धतीने टाकत असतो. आपल्या संघात भुवनेश्वरकुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा असे अनुभवी गोलंदाज आहेत. त्यामुळे गोलंदाजीबाबत मला काळजी वाटत नाही.’