विराट कोहलीचा युवकांना सल्ला

मैदानी खेळ खेळा आणि समाजमाध्यमांवर बराच वेळ वाया घालवू नका, असा सल्ला प्रेरणादायी तंदुरुस्ती आणि कौशल्यपूर्ण खेळासाठी विशेष ओळखला जाणारा भारताचा संघनायक विराट कोहलीने गुरुवारी युवकांना दिला.

‘‘सध्या मुले मैदानी खेळांपेक्षा व्हिडीओ गेम्स अधिक प्रमाणात खेळतात. शारीरिक तंदुरुस्ती ही अतिशय महत्त्वाची असते. हा माझा संदेश फक्त युवकांसाठी नाही, तर देशातील प्रत्येक नागरिकाला आहे,’’ असे कोहलीने एका कार्यक्रमात सांगितले.

समाजमाध्यमांपासून दूर राहण्याबाबत युवकांना मार्गदर्शन करताना कोहली म्हणाला, ‘‘सध्या युवा मंडळी सर्वत्र काय घडते आहे, याचा आढावा घेण्यासाठी दिवसातील बराचसा वेळ समाजमाध्यमांवर घालवतात. हा वेळ मर्यादित ठेवायला हवा. वाचलेला हाच वेळ मग उपयुक्त ठरेल.’’