ऋषभ पंतचा फलंदाजीतला खालावलेला फॉर्म आणि यष्टींमागची सुमार कामगिरी हा भारतीय संघातला गेल्या काही महिन्यांमधला चर्चेचा विषय ठरला आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर निवड समितीने धोनीला डावलून पंतला अधिक संधी देण्याचा निर्णय घेतला. मात्र विंडीज, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश दौऱ्यात पंतने निराशाजनक कामगिरी केली. यानंतरही ऋषभ पंतची आगामी विंडीजविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. मात्र ऋषभला आपली निवड सार्थ करुन दाखवावी लागेल, नाहीतर पंत त्याची जागा घेईल असं मत माजी खेळाडू व्ही.व्ही.एस.लक्ष्मणने व्यक्त केलं आहे.

“माझ्यामते संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने ऋषभ पंतला एक संदेश दिला आहे की तुझ्या जागेसाठी संजू सॅमसनच्या रुपाने पर्याय तयार आहे. आतापर्यंत ऋषभला योग्य आणि पुरेश्या संधी दिल्या गेल्या आहेत, याबद्दल संघ व्यवस्थापनात नक्कीच चर्चा होत असेल. मात्र अखेरीस ऋषभला त्याची संघातली निवड सार्थ ठरवावी लागेल, नाहीतर पंत त्याची जागा घेईल”, लक्ष्मण Star Sports वाहिनीवरील कार्यक्रमात बोलत होता.

अवश्य वाचा – IPL 2020 : कुलदीप यादवसाठी आगामी हंगाम महत्वाचा – संजय बांगर

दुर्दैवाने ऋषभला आतापर्यंत मिळालेल्या संधीचं सोन करता आलेलं नाही, पण तो चांगला खेळाडू आहे. मला आजही विश्वास आहे की तो सामन्याचं चित्र पालटवू शकतो. चेंडू मैदानाबाहेर पाठवण्याची ताकद या खेळाडूत असल्याचंही लक्ष्मण म्हणाला. मध्यंतरी भारतीय संघ व्यवस्थापनाने पंतची खराब कामगिरी पाहता कसोटी मालिकेत त्याला विश्रांती देत अनुभवी वृद्धीमान साहाला आपली पसंती दिली. त्यामुळे आगामी टी-२० मालिकेत भारतीय ऋषभ पंत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.