भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेपूर्वी दिग्गज फलंदाज आणि समालोचक सुनील गावसकर यांनी एक आश्चर्यकारक भविष्यवाणी केली आहे. गावसकर यांचा असा विश्वास आहे, की कसोटी मालिकेत टीम इंडियाचा विजय होईल. टीम इंडिया मालिकेतील एकही सामना गमावणार नाही आणि इंग्लंडला ४-०ने नमवेल. गावसकर यांच्या भविष्यवाणीवर टीम इंडियाचे चाहते भलतेच खुश झाले आहेत, पण आत्तापर्यंतची भारताची इंग्लंडमधील कामगिरी चांगली झालेली नाही. गावसकर यांनी आपल्या या दाव्यानंतर काही खास तर्क दिले आहेत.

सुनील गावस्कर यांनी द टेलीग्राफशी बोलताना सांगितले, ”भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर ६ आठवड्यानंतर सुरू होईल. या सामन्याच्या निकालाचा टीम इंडियावर फरक पडणार नाही. माझा विश्वास आहे, की टीम इंडिया इंग्लंडला ४-० ने हरवेल, कारण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ही मालिका होत आहे.”

हेही वाचा – पदार्पणाच्या कसोटीत ठोकलं होतं द्विशतक, आज तोच क्रिकेटपटू जगतोय हलाखीचं आयुष्य!

खेळपट्टीवर अधिक गवत असणार – गावसकर

इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर ड्यूक बॉल स्विंग होतो. सुनील गावस्कर म्हणाले, ”इंग्लंड नक्कीच खेळपट्टीवर अधिक गवत टाकेल. जेव्हा इंग्लंड भारतात आला होता, तेव्हा त्यांना फिरकीला पोषक असलेल्या खेळपट्ट्या मिळाल्या. त्यानंतर अनेकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले. अशा परिस्थितीत आता इंग्लंडमध्ये टीम इंडियासाठी हिरवी खेळपट्टी बनवता येईल.”

हेही वाचा – टीम इंडियाचे माजी हॉकीपटू उस्मान खान यांचे कर्करोगामुळे निधन

इंग्लंडमधील भारताची कामगिरी

इंग्लंडमधील भारताची कामगिरी काही खास राहिलेली नाही. २००७पासून इंग्लंडमध्ये टीम इंडियाला कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. २०११ मध्ये भारताला ०-४ असा पराभव पत्करावा लागला. यानंतर, २०१४मध्ये त्यांचा १-३ असा पराभव झाला. २०१८मध्ये त्यांना कसोटी मालिका १-४ने गमवावी लागली. इंग्लंडमध्ये ६२ पैकी केवळ ७ कसोटी सामने भारताने जिंकले आहेत. 34 भारतीय संघ गुरुवारी साऊथॅम्प्टनमध्ये पोहोचला आहे, आता तो ३ दिवसांच्या कडक क्वारंटाइन कालावधीत आहे.