ऑलिम्पिकमधील कामगिरीनंतर भारतीय खेळाडू मायदेश परतत आहेत. असं असतानाच तामिळनाडूमधील त्रिची येथे सुब्बा वेंकटेशन आणि धनलक्ष्मी शेखर या दोन भारतीय अ‍ॅथलेट्सचं शनिवारी आगमन झालं. या दोघांनाही त्रिचीमधील नागरिकांनी ग्रॅण्ड वेलकम दिलं. फुलांचे हार घालून दोघांचंही स्वागत करण्यात आलं. सुब्बा आणि धनलक्ष्मी यांनी ऑलिम्पिकमधील आव्हान खूप खडतर होतं असं सांगतानाच पुढील वेळेस आणखीन चांगली कामगिरी करु असं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

धनलक्ष्मीने तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे आभारही मानले. राज्य सरकारने दिलेल्या सरकारी नोकरीमुळे माझ्या कुटुंबासमोरील आर्थिक संकटं काही प्रमाणात कमी होतील अशा भावना धनलक्ष्मीने व्यक्त केल्या. तसेच पुढे बोलताना तामिळनाडूमधून आता अधिक अधिक खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असून भविष्यात हा आकडा आणखीन वाढेल असा विश्वास तिने व्यक्त केला.

मात्र त्यांनंतर अचानक धनलक्ष्मी खाली बसून रडू लागली. अनेकांना या मागील कारणच कळलं नाही. धनलक्ष्मीच्या बहिणीचं नुकतच निधन झालं. बहिणीचं निधन झालं तेव्हा धनलक्ष्मी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी तयारीच्या दृष्टीने घरापासून दूर होती. मात्र घरच्यांनी तिला बहिणीच्या निधनासंदर्भात माहिती न देण्याचा निर्णय घेतला. धनलक्ष्मीला तिच्या खेळावर लक्ष केंद्रीत करता यावं आणि तिने पूर्णपणे स्वत:ला स्पर्धेत झोकून देत चांगली कामगिरी करावी या उद्देशाने तिच्या आईने बहिणीच्या मृत्यूबद्दल तिला भारतात परत येईपर्यंत न सांगण्याचा निर्णय घेतला होता.

एबीपी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार धनलक्ष्मीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधून झाल्यानंतर तिला विमानतळावरच तिच्या एका नातेवाईकाने तिच्या मोठ्या बहिणीचं महिन्याभरापूर्वी निधन झाल्याची माहिती दिली. त्यावेळ धनलक्ष्मी ही पतियालामध्ये ऑलिम्पिकसाठी प्रशिक्षण घेत होती. धनलक्ष्मीची थोरली बहिणी गायत्रीचं १२ जुलै रोजी निधन झालं. मात्र धनलक्ष्मीच्या आईने आपल्या मुलीला तिच्या मोठ्या बहिणीच्या निधनाबद्दल न कळवण्याचा निर्णय घेतला. धनलक्ष्मी २३ जुलै रोजी टोक्योसाठी रवाना होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला. ही बातमी समजल्यानंतर रस्त्यावरच गुडघ्यावर बसून रडणाऱ्या धनलक्ष्मीला तिच्या आईनेच हाताला पकडून उठवत आधार देण्याचा प्रयत्न केल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पहायाला मिळत आहे.

एबीपी नाडूशी बोलताना धनलक्ष्मीची आई उषा यांनी, “मी तिला तिच्या बहिणीच्या निधनाबद्दल कळवलं नाही. तिने दु:खी होऊन ऑलिम्पिकला जाऊ नये, तिच्या कष्टावर पाणी फेरलं जाऊ नये या उद्देशाने मी ही बातमी लपवून ठेवली. तिची मोठी बहिणी कायमच तिच्या कामगिरीवर लक्ष ठेऊन असेल,” असा विश्वास व्यक्त केला. तसेच आपल्या लेकीने ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला याचा आनंदही उषा यांनी व्यक्त केला. तिची पाच वर्षांची मेहनत सार्थकी लागली असंही उषा म्हणाल्या.

तामिळनाडूमधील ज्या मोजक्या तरुण खेळाडूंकडे भविष्यामधील चांगल्या कामगिरीसाठी पाहिलं जातं त्यामध्ये धनलक्ष्मीचा समावेश आहे. त्यामुळेच धनलक्ष्मीने ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणं आणि चांगली कामगिरी करणं हे अधिक महत्वाचं असल्याने तिची आई उषा आणि घरच्यांनी तिला भारतात परत येईपर्यंत बहिणीच्या मृत्यूची खबर लागू दिली नाही. धनलक्ष्मी ही फार गरीब घरातील असून वयाच्या १५ व्या वर्षीच तिचे पित्रृछत्र हरपलं. त्यानंतर याच वर्षी मार्च महिन्यात पतियालामध्ये धनलक्ष्मीने भारताची १०० मीटर ट्रॅकची क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुत्ती चंदला तिने पराभूत केलं आणि ती प्रकाशझोतात आली.