गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा चांगल्याच फॉर्मात आहे. काही दिवसांपूर्वी रोहितने आपला ३३ वा वाढदिवस साजरा केला. या दिवशी जगभरातून रोहितवर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. माजी सलामीवीर गौतम गंभीरने यावेळी रोहीत मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधला सर्वोत्तम खेळाडू असल्याचं म्हटलं होतं. Sports Tak या कार्यक्रमात बोलत असताना गौतम गंभीरने, रोहित शर्मा सध्या ज्या जागेवर पोहचला आहे त्याचं श्रेय महेंद्रसिंह धोनीला जात असल्याचं म्हटलं आहे.

“रोहित आज ज्या ठिकाणी पोहचला आहे, त्याचं श्रेय धोनीला जातं. तुम्ही निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाबद्दल बोलू शकता पण जोपर्यंत तुम्हाला कर्णधाराचा पाठींबा नसेल तोपर्यंत काहीच उपयोग नसतो. सर्व काही कर्णधाराच्या हातात असतं. धोनीने आपल्या काळात नेहमी रोहित शर्माला पाठींबा दिला आहे. माझ्या माहितीप्रमाणे कोणत्याही खेळाडूला इतका पाठींबा मिळाला नसेल.” रोहितची कारकिर्द घडवण्यात धोनीचा किती वाटा आहे यावर गंभीर बोलत होता.

अवश्य वाचा – टी-२० क्रिकेटमध्येही रोहितकडे द्विशतक झळकवायची होती संधी, पण…

सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. बीसीसीआयनेही आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. २०२० वर्षात भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यात रोहित शर्मा सहभागी झाला होता, मात्र अखेरच्या टी-२० सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे त्याला आपलं संघातलं स्थान गमवावं लागलं होतं. आयपीएलमध्ये रोहित मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करतो. मात्र करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे यंदाच्या हंगामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. यातून परिस्थिती सावरल्यास भारतीय क्रिकेटपटू मैदानात कधी उतरतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.