Kamran Akmal says Babar Azam can break Virat Kohli’s record of 50 ODI centuries: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या विश्वचषक २०२३ च्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. रविवारी १९ नोव्हेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. न्यूझीलंडसोबत खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावून वनडे फॉरमॅटमधील ५० वे शतक पूर्ण केले. यासह तो या बाबतीत सचिन तेंडुलकरच्याही पुढे गेला आहे. विराटच्या या नव्या विक्रमावर पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलने एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा ५० शतकांचा विक्रम पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम मोडू शकतो, असा विश्वास पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल याने व्यक्त केला आहे. अकमलच्या मते, अव्वल तीनमध्ये फलंदाजी करणारा फलंदाजच विराटचा वनडेतील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडू शकतो.

बाबर आझम विराट कोहलीचा विक्रम मोडू शकतो –

ए स्पोर्ट्स चॅनलच्या एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमल म्हणाला, “विराटचा विक्रम फक्त अव्वल तीनमध्ये फलंदाजी करणारा फलंदाजच मोडू शकतो. मधल्या फळीतील फलंदाजाला हा विक्रम मोडता येणार नाही. आमच्याकडे बाबर आझम आहे, तो मोडू शकतो. कारण तो अव्वल तीनमध्ये खेळतो. भारताकडे सध्या शुबमन गिल आहे, तो या विक्रमाच्या मागे लागू शकतो.”

हेही वाचा – IND vs AUS Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कोण पटकावणार विजेतेपद? शोएब मलिकने केली मोठी भविष्यवाणी

बाबर आझमने पाकिस्तानसाठी आतापर्यंत ११८ वनडे सामन्यांमध्ये १९ शतके झळकावली आहेत. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानची खराब कामगिरी आणि उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर बाबरने संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने ९ पैकी ४ एकदिवसीय सामने जिंकले होते, तर पाचमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

हेही वाचा – IND vs AUS Final: “टीम इंडियाला प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा मिळेल, पण…”, अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधाराचं मोठं वक्तव्य

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८० शतकं झळकावली आहेत. कसोटीत विराटच्या नावावर २९ तर टी-२० प्रकारात एका शतकाची नोंद आहे. २००९ मध्ये विराटने वनडे कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले होते. १४ वर्षानंतर विराटने वनडे शतकांचे अर्धशतक पूर्ण केले आहे. विराटचं वनडेतील न्यूझीलंडविरुद्धचं हे सहावं शतक आहे. त्याचबरोबर मायदेशातील कोहलीचे हे २२वे शतक आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: According to kamran akmal babar azam can break virat kohlis record of 50 odi centuries in international cricket vbm
Show comments