विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात, भारतीय संघाचं नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे जाण्याची शक्यता आहे. आयपीएल आटोपल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, सरे या क्लबकडून काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. याच कालावधीत अफगाणिस्तानचा संघ भारतात आपला पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी येणार आहे. ८ मे ला बंगळुरुत निवड समितीची बैठक पार पडली जाणार आहे.

टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची शक्यता आहे. याव्यतिरीक्त सध्या यॉर्कशायर संघाकडून काउंटी क्रिकेट खेळत असलेला चेतेश्वर पुजाराही या एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतात परतणार आहे. याचसोबत रोहित शर्मा, शिखर धवन आणि हार्दिक पांड्या या खेळाडूंनाही संघात जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. १४ जूनपासून भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे. ८ मे रोजी पार पडणाऱ्या बैठकीत एकमेव कसोटी सामन्यासह इंग्लंड दौऱ्यातल्या मर्यादीत षटकांच्या सामन्यांसाठीही भारतीय संघाची निवड करणार आहे.

अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना पार पडल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. ३ जुलैपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. याचसोबत ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेला १२ जुलैपासून सुरुवात होणार आहे. याव्यतिरीक्त २७ आणि २९ जून रोजी भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध टी-२० सामने खेळणार आहे. भारतीय संघासोबत निवड समिती, इंग्लंड दौऱ्यात तिरंगी मालिकेसाठी भारत अ संघाचीही निवड करणार आहे. आयपीएलध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना भारत अ संघात जागा मिळण्याची शक्यता आहे.

Story img Loader