Akash Chopra reacts to Mohammed Shami’s place in the playing XI after Hardik Pandya’s comeback: मोहम्मद शमीला रविवारी विश्वचषक स्पर्धेत पहिली संधी मिळाली. धरमशाला येथे झालेल्या न्यूझीलंड (भारत विरुद्ध न्यूझीलंड) विरुद्धच्या सामन्यात या अनुभवी वेगवान गोलंदाजाचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. या सामन्यात मोहम्मद शमीने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. त्याने पाच विकेट्स घेत आश्चर्यकारक कामगिरी केली. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दोन वेळा एका डावात पाच विकेट घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. त्याच्या आणि हार्दिक पांड्याबद्दल आकाश चोप्राने जिओ सिनेमावर बोलताना आपली प्रतिक्रिया दिली.
मोहम्मद शमीने डावाच्या शेवटच्या षटकांमध्ये सातत्याने शानदार गोलंदाजी करत न्यूझीलंडला तीनशेचा टप्पा पार करण्यापासून रोखले. या सामन्यात शमीचा समावेश करण्याचे प्रमुख कारण म्हणजे हार्दिक पांड्याला झालेली दुखापत. पांड्याला घोट्याच्या दुखापतीमुळे भारतीय संघाचे संतुलन बिघडले. फलंदाजीची भरपाई करण्यासाठी सूर्यकुमार यादवला आणले आणि शार्दुल ठाकूरच्या जागी शमीचा समावेश करून संघाची गोलंदाजी मजबूत केली.
इंग्लंडसोबत २९ ऑक्टोबरला होणार आहे सामना –
भारताचा पुढील सामना २९ ऑक्टोबरला लखनऊमध्ये इंग्लंडविरुद्ध होणार आहे. तोपर्यंत हार्दिक खेळण्यासाठी तंदुरुस्त होईल, अशी आशा संघ व्यवस्थापनाला आहे. त्यामुळे भारतीय संघासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. हार्दिकच्या येण्याने संघाला संतुलन मिळते. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये तो संघाचा समतोल साधतो. १९ ऑक्टोबरला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाल्यामुळे २२ ऑक्टोबरच्या सामन्यात खेळू शकला नाही.
हेही वाचा – PAK vs AFG, World Cup 2023: पाकिस्तानला मोठा धक्का, ‘या’ स्टार खेळाडूची तब्येत बिघडल्याने संघातून झाला बाहेर
भारतीय संघाचा माजी सलामीवीर आकाश चोप्राही मोहम्मद शमीच्या कामगिरीवर खूश दिसत होता. उर्वरित सामन्यांसाठीही शमीला प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवण्यात यावे, असे तो म्हणाला. आकाश चोप्रा म्हणाला, “मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की शमी प्लेइंग इलेव्हनमध्ये असावा. हार्दिक पांड्याला दुखापत होणे हे संघासाठी चांगले लक्षण नाही आणि या मजबुरीमुळे शमीला संघात स्थान मिळाले. शमीचा या स्पर्धेतील हा पहिलाच सामना होता आणि त्याने पाच विकेट्स घेतल्या. त्याने मोहालीतील बाटा विकेटवर ऑस्ट्रेलियासोबत जे केले होते, तेच इथे केले. मोहाली आणि धरमशाला येथील शमीचे आकडे अगदी सारखे आहेत. त्याची अचूकता आश्चर्यकारक असून मनगटाची स्थिती चांगली आहे.”
विश्वचषक २०२३ च्या पहिल्या चार सामन्यांमध्ये शमीला संधी देण्यात आली नव्हती. त्याला पाचव्या सामन्यात संधी मिळाली. शार्दुल ठाकूरनेही आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. तो गोलंदाजीमध्ये पूर्ण षटके टाकत नव्हता आणि फलंदाजीतही त्याच्या धावा येत नव्हत्या. अशा स्थितीत संघ व्यवस्थापनाने शमीला सामील करून समतोल साधण्याचा प्रयत्न केला. शमीने अप्रतिम खेळ दाखवत ५४ धावांत पाच बळी घेतले.