Who ended fight between Virat Kohli and Gautam Gambhir : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि स्टार भारतीय फलंदाज विराट कोहली यांच्यातील वाद कसा संपला, याचा खुलासा अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने केला आहे. आयपीएल २०२३ हंगमादरम्यान, लखनऊ सुपरजायंट्सचे तत्कालीन मार्गदर्शक गौतम गंभीर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा खेळाडू विराट कोहली यांच्यात सामन्यादरम्यान आणि सामन्यानंतर वादावादी झाली होती, त्यावेळी हे प्रकरण खूपच तापले होते. मात्र, आयपीएल २०२४ मध्ये परिस्थिती बदलली आणि दोघे एकमेकांची गळाभेट घेताना दिसले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होतं संपूर्ण प्रकरण?

विराट कोहली आणि लखनऊचा वेगवाना गोलंदाज नवीन-उल-हक यांच्यातील मैदानावरील वाद झाला होता. ज्यामध्ये सामन्यानंतर गौतम गंभीर देखील सामील होता, हा आयपीएल इतिहासातील सर्वात मोठ्या वादांपैकी एक होता. लखनऊच्या एकना स्टेडियमवर आरसीबी आणि एलएसजी यांच्यातील सामन्यादरम्यान ही घटना घडली. या सामन्यात विराट कोहलीने नवीन उल हकला अपशब्द वापरले होते. यानंतर सामना संपल्यानंतरही विराट वाद घालताना दिसला, ज्यानंतर एलएसजीचा मार्गदर्शक गौतम गंभीरने आपल्या खेळाडूंचा समर्थनार्थ हस्तक्षेप केला. यानंतर गंभीर आणि विराट यांच्यात मोठा वाद झाला, त्यामुळे तिघांनाही दंड ठोठावण्यात आला.

अमित मिश्राने वाद मिटवण्याचे श्रेय गंभीरला दिले –

शुभंकर मिश्राच्या यूट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत अमित मिश्राने स्पष्टपणे सांगितले की गौतम गंभीरनेच विराट कोहलशी भांडण संपवण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, वाद संपवण्यासाठी कोहलीने पुढे यायला हवे होते, असे मिश्राचे मत आहे. अमित मिश्रा म्हणाला, “मी गंभीरमध्ये चांगली गोष्ट पाहिली. कोहली त्याच्याकडे गेला नाही तर गंभीर वाद संपवण्यासाठी कोहलीकडे गेला. गंभीरने कोहलीला विचारले होते, तू आणि तुझे कुटुंब कसे आहे? हा वाद संपवण्यासाठी कोहलीने नव्हे तर गंभीरने पाऊल उचलले. त्यावेळी गंभीरने मोठे मन दाखवले होते. मात्र, कोहलीने जाऊन हा वाद संपवायला हवा होता. कोहलीने म्हणायला हवे होते की, गौती भाई हा वाद संपवूया.”

हेही वाचा – Hardik Pandya : हार्दिक पंड्याचे भव्य स्वागत…खुल्या बसमधून विजयी परेड, बडोद्यातील चाहत्यांच्या गर्दीचा VIDEO व्हायरल

‘रोहितशी बोलताना मला कधी ही विचार करावा लागत नाही’

कोहली काळानुसार थोडा बदलला आणि कदाचित हे सत्ता आणि प्रसिद्धीमुळे झाले असावे, असेही मिश्रा म्हणाला. अमित मिश्राच्या म्हणण्यानुसार, रोहित स्टार खेळाडू झाल्यानंतरही बदलला नाही. तो म्हणाला, “मी बराच काळ भारतीय संघाचा भाग नाही. यानंतरही जेव्हा मी रोहितला आयपीएलमध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमात भेटतो, तेव्हा तो माझ्याबरोबर चेष्टा-मस्करी करतो. त्याच्याशी बोलताना मला कधीच विचार करावा लागत नाही की तो काय विचार करेल.”

हेही वाचा – MS Dhoni : ‘त्याला उद्याच भारतात परत पाठवा…’, दक्षिण आफ्रिकेत धोनी श्रीसंतवर का संतापला होता? अश्विनने केला खुलासा

“कोहलीला काळानुसार खूप बदललेलं पाहिलं”

विराट कोहलीबद्दल बोलताना अमित मिश्रा पुढे म्हणाला, “मी कोहलीला काळानुसार खूप बदललेलं पाहिलं आहे. आमचं बोलणंही बंद झालं होतं. जेव्हा एखाद्याला सत्ता आणि प्रसिद्धी मिळते, तेव्हा त्याला वाटते की समोरची व्यक्ती केवळ काही कारणास्तव त्याच्याकडे येत आहे. मी त्यांच्यापैकी कधीच नव्हतो. मी चिकूला तो १४ वर्षांचा असल्यापासून ओळखतो. जेव्हा तो समोसे खायचा, रोज रात्री पिझ्झा खायचा, पण चिकू आणि कर्णधार विराट कोहली यांच्यात खूप फरक आहे. अगोदर जेव्हाही तो मला भेटायचा तेव्हा तो आदर करायचा, पण आता तो पूर्वीसारखा राहिलेला नाही.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit mishra revealed who took the initiative to settle the dispute between virat kohli and gautam gambhir vbm