Ashish Nehra expecting no tension between Virat and Gautam : भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने दावा केला आहे की, विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात मला कोणतीही अडचण दिसत नाही. गंभीर श्रीलंका दौऱ्यापासून मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ सुरू करत आहे. या कालावधीत कोहली देखील एकदिवसीय संघाचा भाग आहे. गेल्या वर्षी आयपीएल दरम्यान गंभीर आणि कोहली यांच्यात मैदानावर वाद झाला होता. त्यानंतर यंदाच्या हंगामात दोघांमध्ये चांगले संबंध असल्याचे दिसून आले. कारण मैदानावर दोघे एकमेकांची गळाभेट घेताना दिसले होते.

टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वी कोहलीबरोबरच्या त्याच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती. आता माजी भारतीय गोलंदाज आशिष नेहराला असा विश्वास आहे की, ड्रेसिंग रूममध्ये दोघांमध्ये कोणतेही मतभेद होणार नाहीत. आशिष नेहरा म्हणाला की, गंभीर आणि कोहली दोघेही खूप तापट आहेत आणि जेव्हा ते ड्रेसिंग रूममध्ये असतील तेव्हा ते संघासाठी एकत्र राहतील.

‘विराट-गौतम टीम इंडियासाठी एकजूटीने काम करतील’

‘स्पोर्ट्स तक’ चॅनलशी बोलताना आशिष नेहरा म्हणाला, विराट कोहली आणि गौतम गंभीर दोघेही उत्साही लोक आहेत. जेव्हा-जेव्हा दोघेही संघासाठी खेळले, तेव्हा त्यांनी विरोधी संघाला अडचणीत आणले. आता जेव्हा ते ड्रेसिंग रूममध्ये एकत्र असतील, तेव्हा ते संघासाठी एकजूटीने काम करतील. कोहलीला १६-१७ वर्षांचा अनुभव असून गंभीरही खूप अनुभवी आहे. लोक बाहेर काय चाललंय ते लक्षात ठेवतात. हे फक्त विराट-गौतमबद्दल नाही. असे अनेक खेळाडू आहेत जे यापूर्वी मैदानावर एकमेकांशी भिडले आहेत, परंतु जेव्हा ते संघासाठी एकत्र येतात तेव्हा ते खेळाडू, प्रशिक्षक किंवा वरिष्ठ खेळाडू म्हणून त्यांचे संबंध चांगले असतात.

हेही वाचा – Hardik Pandya : ‘मला हार्दिकबद्दल आश्चर्य वाटते की त्याला…’, बडोद्याच्या माजी प्रशिक्षकाची भारताच्या अष्टपैलू खेळाडूवर टीका

‘गंभीर, स्पष्टवक्ता आणि पारदर्शक आहे’

गौतम गंभीर नेहमी स्पष्ट आणि पारदर्शक असतो आणि फक्त त्याच्या मनाचे ऐकतो, असेही नेहराने म्हटले आहे. तो म्हणाला की, “गौतम गंभीर स्पष्ट आणि पारदर्शक आहे ,जे चांगले आहे. तो त्याच्या मनाचे ऐकतो जे खूप महत्वाचे आहे. होय, मी सहमत आहे की प्रत्येकाची स्वतःची वेगळी कोचिंग शैली असते. मला कोहली आणि गंभीर यांच्यात कोणतीही अडचण दिसत नाही, विशेषत: दोघांची कारकीर्द पाहता.”