Asia Cup out of Pakistan: सध्या भारतात आयपीएल सुरु आहे पण संपूर्ण दिवसभर आशिया चषकाचीच चर्चा होती. त्यामुळे आजचा दिवस हा आशिया चषक २०२३च्या नावावर राहिला असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. भारताने या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला. अशा स्थितीत तटस्थ स्थळाचा पर्याय समोर आला. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, आगामी आशिया चषकाचे यजमानपद श्रीलंकेला मिळण्याची शक्यता आहे. आशियाई क्रिकेट परिषद (ACC) ही स्पर्धा पाकिस्तानमधून हलवण्याच्या तयारीत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाणार नसल्याचे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आधीच स्पष्ट केले होते.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आशिया चषक २०२३ आता पाकिस्तानऐवजी श्रीलंकेत हलवण्यात आला आहे. या वृत्तात असेही म्हटले आहे की, पाकिस्तान या स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत सध्या तरी निर्णय झालेला नाही. पाकिस्तानही या स्पर्धेवर बहिष्कार घालू शकतो. यावेळी आशिया चषक ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये आयोजित केला जाणार आहे. त्यासाठी सप्टेंबर-ऑक्टोबरची विंडो खुली असून तो कालावधी निश्चित करण्यात आला आहे. मात्र, त्याचे वेळापत्रक अद्याप समोर आलेले नाही. याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.
या दोन ठिकाणी स्पर्धा खेळवता येतील
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार एसीसीच्या अहवालात असेही समोर आले आहे की, जर आशिया चषक २०२३ श्रीलंकेत गेला तर तो डांबुला आणि पल्ल्लेकल्ले येथे आयोजित केला जाऊ शकतो. कोलंबोमध्ये सप्टेंबर महिन्यात मान्सूनचा हंगाम असतो. त्यामुळे ही दोन शहरे फायनल होऊ शकतात. दुसरीकडे पाकिस्तानचा संघ आला तर सहा देशांची स्पर्धा होईल. अन्यथा ते भारत, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ या पाच देशांमध्ये होऊ शकते. पाकिस्तानने आशिया चषक स्पर्धेवर बहिष्कार घातला तर २०२३ च्या विश्वचषकात सहभागी होणार की नाही यावरही संभ्रम निर्माण झाला आहे.
काय होता संपूर्ण वाद?
वास्तविक संपूर्ण प्रकरण असे आहे की, आशिया चषकाचे आयोजन यावेळेस पाकिस्तानमध्ये होणार होते. त्यांना आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद मिळाले होते. त्याचवेळी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टी२० विश्वचषक २०२२ दरम्यान पाकिस्तानला भेट देण्यास नकार दिला. यानंतर हा वाद वाढला. पीसीबीचे तत्कालीन प्रमुख रमीझ राजा यांनीही २०२३ च्या वनडे वर्ल्ड कपसाठी भारतात न येण्याची धमकी दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी पाकिस्तान क्रिकेटमध्ये सत्तापरिवर्तन झाले आणि नजम सेठी आले. तटस्थ ठिकाणी ही स्पर्धा होऊ नये यासाठीही त्यांनी आग्रह धरला. यानंतर, पाकिस्तानने हायब्रीड मॉडेलबद्दल पर्याय सुचवला, ज्या अंतर्गत भारताविरुद्धचे सामने तटस्थ ठिकाणी आणि उर्वरित स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होईल. आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) हेही फेटाळले होते. इथून वाद आणखीनच वाढला.
पाकिस्तानने ही स्पर्धा आपल्या देशात आयोजित करण्याचा निर्धार केला होता. त्याचबरोबर सुरक्षेच्या कारणांमुळे आणि राजकीय मतभेदांमुळे भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करू शकत नाही. त्यामुळे ही स्पर्धा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात होती. भारतीय बोर्डानेही पाच देशांदरम्यान एकदिवसीय स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. आता आलेल्या अहवालानुसार पाकिस्तान बहिष्कार घालणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच या स्पर्धेत फक्त पाच देश सहभागी होऊ शकतात. सध्या याबाबत बोर्ड आणि एसीसी या दोघांकडूनही घोषणेची प्रतीक्षा आहे.