विश्वचषकानंतरची सगळ्यात मोठी स्पर्धा असं एकेकाळी आशिया चषकाचं वर्णन केलं जायचं. भारत, पाकिस्तान, श्रीलंका या संघांच्या दबदब्यामुळे आशिया चषकाला वलयही होतं. मात्र क्रिकेटेत्तर कारणांमुळे कधी बहिष्कार, कधी माघार यामुळे आशिया चषकाला असलेलं महत्त्व कमी होत गेलं. पाकिस्तानातील अस्थिर परिस्थितीमुळे स्पर्धेचं संयोजन त्यांच्यासाठी कठीण झालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९८४ मध्ये आशियाई देशांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध असावेत या भूमिकेतून या स्पर्धेची सुरुवात झाली. पहिल्यावहिल्या स्पर्धेत अवघे तीनच सामने झाले. युएईत शारजा इथे हे तीन सामने झाले. भारतानेच जेतेपद पटकावलं. दर दोन वर्षांनी ही स्पर्धा होईल असं ठरलं होतं. त्यानुसार १९८६ मध्ये श्रीलंकेत स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. मात्र श्रीलंकेशी संबंध दुरावल्याने भारताने स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. १९८३ मध्ये श्रीलंकेत यादवी युद्ध झालं होतं. यामध्ये शेकडो नागरिकांनी जीवही गमावला. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या माध्यमातून भारताने श्रीलंकेत शांतता सेनाही पाठवली.श्रीलंकेत झालेला संघर्ष आणि त्यामुळे निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती यामुळे भारताने आशिया चषकावर बहिष्कार टाकला. स्पर्धा दोनच संघांमधली होऊ नये यासाठी बांगलादेशला निमंत्रण देण्यात आलं.

आणखी वाचा: Asia Cup 2023: चाहत्यांसाठी खूशखबर आशिया कपचे सर्व सामने तुम्ही पाहू शकता विनामूल्य; कधी, कुठे? जाणून घ्या

१९९०-९१ साली भारतात झालेल्या आशिया चषकातून पाकिस्तानने माघार घेतली. नव्वदीच्या दशकात भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले होते. यामुळेच पाकिस्तानने भारतात येऊन खेळण्यास नकार दिला.

१९९३ साली भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध दुरावलेले असल्याने स्पर्धाच रद्द करण्यात आली. पाकिस्तानकडे स्पर्धेचं संयोजन होतं. पण भारतीय संघ तिथे जाऊन खेळणं शक्य नव्हतं. दुरावलेल्या संबंधामुळे तटस्थ ठिकाणी खेळणंही शक्य नव्हतं. अखेर स्पर्धाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आणखी वाचा: Asia Cup 2023: मोठी बातमी! के.एल. राहुलचे पुनरागमन टीम इंडियाला पडणार महागात? पाकिस्तान-नेपाळविरुद्धच्या सामन्यातून बाहेर

यानंतर स्पर्धा सुरळीतपणे होऊ लागली. २०१५ मध्ये आयसीसीने आशियाई क्रिकेट काऊंसिलचे पंख छाटले. वनडे फॉरमॅटमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या प्रारुपात २०१६ मध्ये बदल करण्यात आला. २०१६ साली आशिया चषक ट्वेन्टी-२० प्रकारात खेळवण्यात आला. २०१६ ट्वेन्टी२० वर्ल्डकपच्या थोडे दिवस आधीच ही स्पर्धा असल्याने ट्वेन्टी२० प्रकार निवडण्यात आला.

२०१८ साली आशिया चषक भारतात होणार होता. मात्र भारत-पाकिस्तान संबंध सुरळीत नसल्याने युएईला यजमानपद देण्यात आलं. आशिया चषक ही आयसीसीतर्फे आयोजित स्पर्धा नाही. पण भारतात खेळण्यासाठी पाकिस्तानच्या संघाला सरकारी मान्यता मिळणं आवश्यक होतं. केंद्र सरकारने पाकिस्तानच्या संघाला निमंत्रित करण्यास तयारी दर्शवली नाही. हे स्पष्ट आयोजनपद युएईकडे सोपवण्यात आलं.

२०२० साली कोरोना संकटामुळे स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली. २०२१ मध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने स्पर्धा वर्षभरासाठी लांबणीवर टाकण्यात आली. अखेर २०२२साली युएईत ही स्पर्धा खेळवण्यात आली.

यंदाचा आशिया चषकाचे संयोजक पाकिस्तान आहे. मात्र बीसीसीआयने भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही असं स्पष्ट केल्याने तिढा निर्माण झाला. भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानमध्ये आला नाही तर पाकिस्तानचा संघ वर्ल्डकपसाठी भारतात येणार नाही अशी वक्तव्यं पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी केली. दोन्ही देशांच्या बोर्डादरम्यान चर्चेच्या फेऱ्या झाल्या. स्पर्धा युएईत खेळवण्यासंदर्भातही विचार झाला. पाकिस्तानने सुरुवातीला देशाबाहेर खेळण्यास नकार दिला होता. भारतीय संघ पाकिस्तानात न खेळण्यावर ठाम होता. असंख्य महिन्यांच्या वाटाघाटीनंतर स्पर्धेसाठी हायब्रिड स्वरुप ठरवण्यात आलं. चार सामने पाकिस्तानमध्ये तर उर्वरित सामने श्रीलंकेत खेळवण्यात येणार आहेत. यंदा भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तानच्या बरोबरीने नेपाळचं या स्पर्धेत पदार्पण होणार आहे.

१९८४ ते २०२३ या इतक्या प्रदीर्घ कालावधीत विविध राजकीय, सामाजिक आणि सुरक्षाविषयक कारणांमुळे पाकिस्तानला केवळ एकदाच स्पर्धेचं आयोजन करता आलं आहे. यंदाही पाकिस्तानकडे आयोजन आहे पण बहुतांश सामने श्रीलंकेतच होणार आहेत. भारत-पाकिस्तान ताणलेल्या संबंधांचं सावट या स्पर्धेवर सातत्याने पडलं आहे. आयसीसी ५० षटकांचा वर्ल्डकप, ट्वेन्टी२० वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी, दोन देशांमधील स्पर्धा तसंच जगभरात सुरू झालेल्या ट्वेन्टी२० लीग यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं कॅलेंडर व्यग्र झालं आहे. त्यामध्ये आशिया चषकासाठी जागा निर्माण करणंही कठीण आहे. हायब्रिड स्वरुपामुळे खेळाडू आणि प्रक्षेपण कंपनीसाठी ही स्पर्धा कसरतच आहे. पण अवघ्या महिना-दीड महिन्यावर आलेल्या वर्ल्डकपच्या दृष्टिकोनातून खेळाडूंचा फिटनेस आणि कामगिरी यांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने यंदाचा वनडे स्वरुपातला आशिया चषक महत्त्वाचा असणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asia cup controversies boycott canceled shifted psp
Show comments