पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एरवी शांतता असलेला राष्ट्रपती भवनातील अशोका हॉल मंगळवारी मात्र टाळ्यांच्या कडकडाटांनी दुमदुमला. निमित्त होते देशातील क्रीडा गुणवत्तेच्या सन्मानाचे. क्रीडाक्षेत्रात देशाचे नाव उंचावणाऱ्या खेळाडू आणि प्रशिक्षकांना केंद्र सरकारच्या वतीने मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

एरवी राजकीय शिष्टाचार पाळला जाणाऱ्या अशोका हॉलमध्ये शिस्त होतीच. मात्र, वातावरणात उत्साह होता, उपस्थितांच्या चेहऱ्यावर कौतुक, समाधानाच्या भावना होत्या. शरीर साथ देत नसताना तोंडाने तीर मारून आशियाई सुवर्णपदकापर्यंत पोहोचलेली पॅरा-तिरंदाज शीतल देवी, पॅरा कॅनॉइंगपटू प्राची यादव आणि भारताचा तारांकित वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, तसेच युवा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू आर. वैशाली हे खेळाडू जेव्हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले, तेव्हा टाळ्यांचा गजर टिपेला पोहोचला होता. व्हिलचेअरवरून आलेल्या पॅरा-खेळाडूंचा सन्मान करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही रहावले नाही. त्या आपली जागा सोडून खाली आल्या आणि खेळाडूंचा गौरव केला.

‘फोकोमेलिया’ हा दुर्मीळ आजार असणाऱ्या शीतलचा सन्मान होत असताना काही क्षण अशोका हॉलमधील वातावरण भावनात्मक होऊन गेले. उपस्थितांनी उभे राहून शीतलचे कौतुक केले.

हेही वाचा >>>IND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध होणार अनेक विक्रम, कोहली-रोहित शर्मासाठी अखेरची संधी? जाणून घ्या

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सात सामन्यांत २४ गडी बाद करणाऱ्या शमीलाही अशीच उस्त्फूर्त दाद मिळाली. आगामी दोन स्पर्धा आणि मालिका मोठ्या असल्यामुळे स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्याचे आव्हान माझ्यासमोर आहे. त्याच दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत, असे शमीने पुरस्काराच्या पूर्वसंध्येला झालेल्या मंत्रालयाच्या स्वागत समारंभात सांगितले.

गेल्या वर्षी बॅडमिंटन खेळात देशाचे नाव उंचावणाऱ्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या दुहेरीतील जोडीला क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. मात्र, सध्या मलेशिया खुल्या स्पर्धेत ते खेळत असल्याने पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा दरवर्षी मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी २९ ऑगस्टला पार पडतो. मात्र, गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झाल्याने पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे हा सोहळा मंगळवारी संपन्न झाला. या वेळी पॅरा खेळाडूंसह एकूण २६ क्रीडापटूंना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.

यासह सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकांना द्रोणाचार्य, क्रीडाक्षेत्रातील योगदानाबद्दल ध्यानचंद जीवनगौरव, सर्वोत्कृष्ट विद्यापीठ अशा पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. खेलरत्नसाठी पदक आणि रोख २५ लाख, तर अर्जुनसाठी वीर अर्जुनाचा कांस्य पुतळा आणि रोख १५ लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.

हेही वाचा >>>IND vs SA: न्यूलँड्सच्या खेळपट्टीबाबत आयसीसीने घेतला मोठा निर्णय, दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड चिंतेत

आशियाई क्रीडा स्पर्धेतील यशाचे प्रतिबिंब

हा पुरस्कार सोहळा म्हणजे भारताच्या हांगझो आशियाई क्रीडा स्पर्धेतील यशाचे प्रतिबिंब होते. भारताने या स्पर्धेत विक्रमी १०७ पदकांची कमाई केली होती. भारताला प्रथमच तीन आकडी मजल मारता आली होती. यंदा गौरविण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये आशियाई स्पर्धेतील खेळाडूंची संख्या अधिक होती.

ईशा सिंह अनुपस्थित

सात्त्विक-चिराग यांच्याप्रमाणेच नेमबाज ईशा सिंह हीसुद्धा एका स्पर्धेत खेळत असल्याने पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकली नाही. ईशा जकार्ता येथे आशियाई पात्रता फेरीत खेळत आहे. पुरस्कार सोहळ्याच्या आदल्या दिवशीच तिने पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली.

युवा प्रतिभेचा गौरव

यंदाच्या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे युवा खेळाडूंचा सन्मान. ओजस देवताळे, आदिती स्वामी, ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, पारुल चौधरी, मुरली श्रीशंकर, सुशीला चानू, अंतिम पंघल अशा युवा खेळाडूंचा यात समावेश होता. हा सोहळा भारतीय क्रीडाक्षेत्राचे भविष्य उज्ज्वल असल्याची साक्ष देणाराच होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Athletes felicitated with arjuna award by president at ashoka hall sport news amy
Show comments