मुंबई : याच नव्हे, तर गेल्या अनेक विश्वचषक स्पर्धामधील सर्वोत्तम संघ, असा रास्त गवगवा झालेला भारतीय संघ कोटय़वधी अपेक्षांच्या दडपणाखाली रविवारी पूर्णपणे निष्प्रभ ठरला. संपूर्ण स्पर्धेत दिसून आलेला सूर अंतिम सामन्यात भारताला अखेपर्यंत गवसलाच नाही. त्याचा अचूक फायदा उठवत मुरब्बी ऑस्ट्रेलियाने मोक्याच्या क्षणी बाजू उलटवली आणि एकदिवसीय स्पर्धेच्या विश्वविजेतेपदावर सहाव्यांदा नाव कोरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या दोन संघांमध्ये २००३ विश्वचषक स्पर्धेतही अंतिम सामना झाला होता आणि तो ऑस्ट्रेलियाने सहज जिंकला होता. या सामन्यातही सुरुवातीची काही षटके वगळता ऑस्ट्रेलियाने सामन्यावरील पकड जराही ढिली पडू दिली नाही. अखेरीस सहा गडी आणि सात षटके राखून हा सामना त्यांनी अपेक्षेपेक्षा सहजपणे जिंकला.

हेही वाचा >>> अंतिम निकालाबाबत निराशा, पण स्पर्धेतील प्रवासाबाबत समाधानी! मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडची प्रतिक्रिया

या स्पर्धेत भारतीय गोलंदाजी सर्वोत्तम ठरली होती. मात्र, अंतिम सामन्यात एकाही गोलंदाजाला प्रभाव पाडता आला नाही. भारतीय फलंदाजी या स्पर्धेत विलक्षण बहरली होती. तरी अंतिम सामन्यात एकाही फलंदाजाला म्हणावी अशी छाप पाडताच आली नाही. रोहित शर्मा अर्धशतकासमीप पोहोचला, पण मोक्याच्या क्षणी बाद झाला. विक्रमवीर विराट कोहली अर्धशतक झळकावून लगेचच बाद झाला. तर के. एल. राहुलचे अर्धशतक कुर्मगतीमुळे संघासाठी कुचकामी ठरले. शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव हे इतर फलंदाज अपयशी ठरले. माफक २४० धावांचा बचाव करताना गोलंदाजांनाही सूर सापडला नाही. पहिल्या सत्रापेक्षा अधिक जिवंत झालेली खेळपट्टी, दव आणि स्पर्धेत याआधी दाखवलेल्या कल्पकतेचा अभाव या घटकांमुळे भारतीय गोलंदाजी कुचकामी ठरली.

अंतिम फेरीत याआधी धडकलेल्या सर्व भारतीय संघांच्या तुलनेत यंदाचा भारतीय संघ नि:संशय सरस होता. त्याचप्रमाणे, आजवर दिग्विजयी ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघांच्या तुलनेत विद्यमान संघ कमकुवत होता. तरीही अंतिम सामन्यात छोटय़ा-छोटय़ा बाबींवर लक्ष केंद्रित करून, प्रतिस्पर्ध्याला कोणतीही संधी न देता आणि अपेक्षांचे जराही दडपण नसल्यामुळे अधिक मोकळेपणाने खेळ करत ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघावर बाजू उलटवली. या पराभवामुळे कोटय़वधी भारतीय क्रिकेट रसिकांची घोर निराशा झालीच. पण मोक्याच्या क्षणी भारतीय संघ नांगी टाकतो, या समजाला बळही मिळाले.

पराभवास कारण की..

* निर्जीव खेळपट्टीवर नाणेफेकीचा प्रतिकूल कौल

* ऑस्ट्रेलियन गोलंदाजीवर प्रतिहल्ल्याचा अभाव

* साचेबद्ध व्यूहरचना (पाच गोलंदाज, सहा फलंदाज)

* क्षेत्ररक्षणाच्या दर्जातली तफावत.

* दव या घटकाविषयी विचारच केलेला नसल्याचे स्पष्ट

* रोहित, विराट, बुमरा, शमीवर अतिविसंबून राहणे

* मैदानातील लाखभर, मैदानाबाहेरील कोटय़वधी अपेक्षांचे दडपण

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia defeat india in icc cricket world cup final 2023 in ahmedabad zws
Show comments