Bangladesh Team Complaint regarding internet speed slow in Pakistan : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका २१ ऑगस्ट पासून खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी बांगलादेशचा संघ काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानात पोहोचला आहे. सध्या दोन्ही संघ सराव करत असून बांगलादेश संघाने पाकिस्तानमध्ये इंटरनेट स्पीड स्लो असल्याची तक्रार केली आहे. ज्यामुळे पीसीबीची खिल्ली उडवली जात आहे.

मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की पाकिस्तानमध्ये इंटरनेट स्लो असल्यामुळे बांगलादेशचे खेळाडू त्यांच्या कुटुंबीयांशी नीट बोलू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी तक्रार केली आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिनी जिओ न्यूजच्या एका पत्रकाराने दावा केला आहे की, बांगलादेश क्रिकेट संघाने आपल्या संघ व्यवस्थापनाकडे तक्रार केली आहे की पाकिस्तानमध्ये इंटरनेटचा वेग कमी असल्यामुळे त्यांना समस्या येत आहेत.

इंटरनेटचे स्पीड इतके स्लो आहे की त्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी बोलताही येत नाही. त्याचप्रमाणे बांगलादेशातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. शेख हसीना बांगलादेशातून पळून गेल्यापासून देशात खूप हिंसाचार झाला आहे. म्हणूनच बांगलादेशच्या खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांची काळजी वाटत आहे. पण पाकिस्तानमध्ये इंटरनेट स्पीड स्लो असल्याने त्यांना नीट व्हिडिओ कॉलही करता येत नाहीत.

हेही वाचा – Samit Dravid : कुणी म्हटलं ‘ज्युनियर वॉल’ तर कुणी भावी ‘हिटमॅन’, द्रविडच्या मुलाच्या षटकाराने वेधले सर्वांचे लक्ष

बांगलादेशचा संघ पाकिस्तानात लवकर पोहोचला –

बांगलादेशमधील हिंसाचारामुळे त्यांचा संघ लवकर पाकिस्तानात पोहोचला आहे. खुद्द पीसीबीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला ही ऑफर दिली होती जी त्यांनी स्वीकारली. मात्र, आता बांगलादेशी संघ रावळपिंडीत एका वेगळ्याच समस्येला तोंड देत आहे. या मालिकेबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. पहिली कसोटी रावळपिंडी येथे २१ ऑगस्ट रोजी सुरु होणार आहे. तसेच दुसरी कसोटी ३० ऑगस्ट पासून कराचीत खेळवली जाणार आहे.