BCCI New Guidelines For Indian Players and Families: ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर मालिका गमावल्यानंतर बीसीसीआय अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. भारताने तब्बल एका दशकानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावली आणि यासह कसोटीतील भारताची कामगिरीही खालावली. यानंतर आता बीसीसीआयने खेळाडूंसाठी कठोर नियम तयार केले आहे, जिथे त्यांनी क्रिकेटपटू आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आढावा बैठकीमध्ये हे निर्णय घेण्यात आले आहेत.
इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, बीसीसीआयने खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालिकेदरम्यान एकत्र राहण्याबाबत निर्णय घेत आहे. क्रिकेटपटूंच्या पत्नी किंवा गर्लफ्रेंड खेळाडूंबरोबर ४५ दिवसांची किंवा एका महिन्याची मालिका असेल तर यादरम्यान २ आठवड्यांपेक्षा जास्त वेळ राहू शकत नाही, असा निर्णय घेण्यात येणार आहे. पुढे असेही नमून केले आहे की सर्व खेळाडूंना टीम बसने प्रवास करणे बंधनकारक केले जाईल आणि अतिरिक्त सामानासाठी खेळाडूंना पैसे द्यावे लागतील.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी १-३ ने गमावल्यानंतर हे मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. केवळ ऑस्ट्रेलियातील संघाची कसोटी मालिकेतील कामगिरीच नाही, तर ऑस्ट्रेलियातून समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सने ड्रेसिंग रूममधील वातावरणी खराब असल्याचे सुचवले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अनेक घडामोडी घडल्या. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह कर्णधार, अचानक मालिकेच्या मध्यातच रविचंद्रन अश्विनची निवृत्ती आणि कर्णधार रोहित शर्माने अखेरच्या कसोटीत घेतलेली विश्रांती.
बीसीसीआयचे खेळाडू आणि कुटुंबांसाठी नवे नियम
- जर स्पर्धा किंवा मालिका ४५ दिवस अथवा त्यापेक्षा अधिक दिवसांची असेल तर खेळाडूंचे कुटुंबीय फक्त १४ दिवस त्यांच्यासह राहू शकतात.
- जर स्पर्धा किंवा मालिका ४५ दिवसांपेक्षा कमी दिवसांची असेल तर कुटुंबीय ऱक्त ७ दिवस सोबत राहू शकतात.
- खेळाडूंच्या पत्नी त्यांच्यासह संपूर्ण स्पर्धेसाठी सोबत राहू शकत नाही.
- खेळाडूंचे कुटुंबीय त्यांच्यासह फक्त २ आठवडे राहू शकतात.
- मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा पर्सनल मॅनेजरला टीम बस किंवा व्हीआयपी बॉक्समध्ये येण्याची परवानगी नसेल. पर्सनल मॅनेजरलाही वेगळ्या हॉटेलमध्ये राहावे लागले.
- जर खेळाडूंच्या सामनाचं वजन १५० किलोपेक्षा अधिक असेल तर बीसीसीआय खेळाडूंच्या सामनासाठी अधिक पैसे देणार नाही.
अलीकडेच, भारताचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा, कोच गौतम गंभीर आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी नवीन सचिव आणि खजिनदार यांच्यासह बीसीसीआयच्या उच्च अधिकाऱ्यांची भेट घेतली, जिथे या मुद्द्यांवर चर्चा झाली. विराट कोहली आणि रोहितसह अनुभवी खेळाडूंचे भवितव्य तसेच गंभीरच्या कोचिंग स्टाफचा कार्यकाळ हा बैठकीत चर्चेचा प्रमुख विषय होता. संघातील सपोर्ट स्टाफचा कार्यकाळ तीन वर्षांपर्यंत मर्यादित ठेवावा, अशी सूचनाही बैठकीत करण्यात आली.
© IE Online Media Services (P) Ltd