Team India not going to Pakistan for Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे यजमानपद पाकिस्तानकडे असणार आहे. २०१७ नंतर पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले जाणार आहे. जिथे या ट्रॉफीसाठी ८ देशांदरम्यान लढत होणार आहे. पाकिस्तानने १९९६ पासून कोणत्याही आयसीसी स्पर्धेचे आयोजन केलेले नाही. त्यावेळी भारत आणि श्रीलंकेसोबत पाकिस्तानने एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन केले होते. पण या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार की नाही याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार का?

वृत्तानुसार, भारतीय संघ या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही. बीसीसीआच्या सूत्रांनी आयएएनएसला सांगितले की, टीम इंडिया पुढील वर्षी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी पाकिस्तानला जाणार नाही. तसेच, ठिकाण बदलले जाऊ शकते किंवा हायब्रीड मॉडेलचा मार्ग देखील निवडला जाऊ शकतो. आशिया कप २०२३ चे यजमानपदही पाकिस्तानला मिळाले होते. पण टीम इंडियाने पाकिस्तानचा दौरा केला नाही, त्यानंतर ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर खेळली गेली आणि टीम इंडियाने आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळले.

द्विपक्षीय मालिकेबद्दल दोन्ही बोर्डाचे काय मत?

पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी नुकतेच सांगितले होते की, भारताने पुढील वर्षी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला संघ पाकिस्तानला पाठवला तर पीसीबी त्यांच्यासोबत द्विपक्षीय मालिका खेळण्यास तयार आहे. मात्र, बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, द्विपक्षीय मालिका विसरून जा, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौराही करू शकत नाही. त्यामुळे जागेत बदल होऊ शकतो किंवा हायब्रीड मॉडेल देखील शक्य आहे. सूत्रांनी पुढे सांगितले की, या दौऱ्यासाठी भारतीय बोर्डाला सरकारची परवानगी लागेल, सध्या पाकिस्तानशी आमचे संबंध चांगले नाहीत. अशा परिस्थितीत ते जवळजवळ अशक्य आहे.

हेही वाचा – VIDEO : RCB विरुद्धच्या सामन्यापूर्वी हैदराबादच्या खेळाडूला बसला १० हजार रुपयांचा फटका, सराव सत्रात लागली खिशाला कात्री

शेवटची द्विपक्षीय मालिका २०१२-१३ मध्ये खेळली गेली होती –

भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान खेळली गेलेली शेवटची मालिका २०१२-२०१३ मध्ये झाली होती, जेव्हा पाकिस्तानने भारताचा दौरा केला होता आणि दोन्ही संघांमध्ये दोन टी-२० आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली होती. त्यानंतर हे दोन्ही देश कधीच आमनेसामने आले नाहीत. तथापि, जवळजवळ प्रत्येक आयसीसी स्पर्धेत दोन्ही देश एकमेकांसमोर असतात. त्याचबरोबर टीम इंडियाने शेवटचा पाकिस्तान दौरा २००८ मध्ये केला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci source team india will not travel to pakistan for 2025 champions trophy ind vs pak updates vbm