Bhuvneshwar Kumar removed the word cricketer from his Instagram bio: टीम इंडिया २०२३ मध्ये अनेक मोठ्या टूर्नामेंटमध्ये सहभागी होणार आहे. यावर्षी एकदिवसीय विश्वचषकाव्यतिरिक्त आशिया चषक, आशियाई क्रीडा स्पर्धा यासारख्या स्पर्धा खेळल्या जाणार आहेत. जिथे भारताला जिंकण्याची मोठी संधी आहे. त्याचबरोबर टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. दरम्यान, एका भारतीय खेळाडूने असा निर्णय घेतल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या विषयावर चाहते खूप चर्चा करताना दिसत आहेत. हा मुद्दा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारशी संबंधित आहे. भुवनेश्वर कुमारने आपल्या सोशल मीडियावर असे काही केले आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियावर निर्माण झाला गोंधळ –

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने अचानक सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये घबराट निर्माण केली आहे. खरं तर, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टनुसार, भुवनेश्वर कुमारने त्याच्या इंस्टाग्राम बायोमध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार, यापूर्वी त्याने आपल्या बायोमध्ये भारतीय क्रिकेटर असे लिहिले होते, परंतु आता त्याने ते बदलून फक्त भारतीय केले आहे. चाहत्यांना ही गोष्ट आवडलेली नाही. भुवनेश्वर कुमारने अद्याप निवृत्तीची घोषणा केलेली नाही, परंतु त्याच्या बायोमधून क्रिकेटर हटवणे हे एक चिन्ह आहे की तो लवकरच एक मोठी घोषणा करेल.

भुवनेश्वर कुमार बराच काळ टीम इंडियातून बाहेर –

भुवनेश्वर कुमार बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. तो भारतासाठी अनेक सामने खेळला आहे. गेल्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकात तो टीम इंडियाचा भाग होता, पण त्यानंतर त्याला फक्त एकाच मालिकेत खेळण्याची संधी मिळाली. २०२२ च्या अखेरीस त्याने न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. भुवनेश्वर कुमारलाही कळले आहे की त्याचे टीम इंडियात पुनरागमन खूप कठीण आहे. अशा परिस्थितीत तो लवकरच टीम इंडियातून निवृत्त होऊ शकतो, असे मानले जात आहे.

हेही वाचा – IND vs WI 1st ODI: इशान-कुलदीपच्या जोरावर भारताचा वेस्ट इंडिजवर पाच विकेट्सने विजय, मालिकेत १-० ने घेतली आघाडी

भुवी अनेकदा दुखापतींमुळे हैराण –

भुवनेश्वर कुमार आपल्या कारकिर्दीत अनेकवेळा दुखापतीमुळे दीर्घ विश्रांती घेतली आहे. त्याच्या दुखापतींचा त्याला अनेकदा त्रास होतो. आयपीएल असो की वर्ल्ड कप मोठ्या स्पर्धांमध्येही त्याला दुखापतीमुळे मधूनच बाहेर राहावे लागले. भुवनेश्वर कुमारने २०१८ साली भारतासाठी शेवटचा कसोटी सामना आणि जानेवारी २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्याने भारतासाठी १२१ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४१ बळी घेतले आहेत. तर त्याने ८७ टी-२० मध्ये ९० विकेट्स आणि २१ कसोटी सामन्यात ६३ विकेट घेतल्या आहेत. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ७ वेळा ५ विकेट्स घेतल्या आहेत.