Champions Trophy 2025 Suresh Raina prediction about player of the tournament : आता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सुरू होण्यासाठी काही आठवडे शिल्लक राहिले आहेत. १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेबद्दल चाहते, क्रिकेट तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटूंमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. यासोबतच अंदाजांची मालिकाही सुरूच झाली आहे. अनेक तज्ञांनी त्यांच्या आवडत्या उपांत्य फेरीतील आणि अंतिम फेरीतील संघांची नावे सांगितली आहेत. अशात सुरेश रैनाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’बाबत आश्चर्यकारक भाकीत केले आहे.

‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ बाबत सुरेश रैनाचं मोठं भाकीत –

भारताचा माजी डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने चॅम्पियन्स ट्रॉफीचा ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ कोण असेल याबाबत भविष्यवाणी केली आहे. त्याने भारतीय कर्णधार रोहित शर्मा किंवा स्टार फलंदाज विराट कोहलीचे नाव घेतले नाही. युवा फलंदाज शुबमन गिल हा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू ठरेल, असा विश्वास रैनाने व्यक्त केला आहे. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सुरेश रैना म्हणाला, “शुबमन गिल चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरला, तर मला आश्चर्य वाटणार नाही.”

शुबमन गिलची एकदिवसीय कारकीर्द –

शुबमन गिल एकदिवसीय फॉर्मेटमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये रोहितसोबत भारतासाठी सलामी देताना दिसू शकतो. त्याने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. गिलने आतापर्यंत ४७ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५८.२० च्या सरासरीने आणि १०१.७४ च्या स्ट्राईक रेटने २३२८ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ६ शतके आणि १३ अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या २०८ आहे. गिलने २०२३ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात द्विशतक झळकावले होते. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही गिलवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याला भारतीय संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

दुबई येथे पाकिस्तानने आयोजित केलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आपले सर्व सामने हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळणार आहे. भारता २० फेब्रुवारीला बांग्लंदेशविरुद्धच्या सामन्याने आपल्याला मोहिमेला सुरुवात करेल. यानंतर २३ फेब्रुवारीला भारताचा दुसरा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. भारताला तिसऱ्या साखळी सामन्यात न्यूझीलंडचा सामना (२ मार्च) करायचा आहे. जर भारत उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत पोहोचला तर त्याचे सामने दुबईतच होतील. जर भारत पात्र ठरू शकला नाही, तर लाहोरला ९ मार्च रोजी अंतिम फेरीचे आयोजन केले जाईल.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग , यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल.

Story img Loader