भारत विरुद्ध इंग्लडदरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवसावर भारतीय गोलंदाजांनी छाप पाडली आणि भारताला विजय मिळवून दिला. आधी मोहम्मद शमीने अर्धशतकी खेळीच्या बळावर तळाच्या फलंदाजांना साथीला घेत इंग्लंडपुढे विजयासाठी ६० षटकांत २७२ धावांचे आव्हान ठेवले. मग मोहम्मद सिराज, जसप्रित बुमरासह भारताच्या वेगवान माऱ्याने इंग्लंडचा दुसरा डाव १२० धावांत गुंडाळत दुसऱ्या कसोटीत १५१ धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच सोशल नेटवर्किंगवर प्रचंड सक्रीय असणाऱ्या महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रांनी अवघ्या एका शब्दामध्ये भारतीय संघाचं कौतुक केलं आहे. हा शब्द आहे, Chutzpah!

इतर सर्वसामान्य भारतीयांप्रमाणे आनंद महिंद्रासुद्धा क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. अनेकदा भारताने भन्नाट कामगिरी केली किंवा ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आनंद महिंद्रांच्या ट्विटर टाइमलाइनवर उड्या पडतात कारण ते अगदी हटके पद्धतीने व्यक्त होतात. असेच काहीसे काल भारताने लॉर्ड्सवर कसोटी जिंकल्यानंतर झालं. भारताने भारतीय वेळेनुसार रात्री अकराच्या सुमारास वगैरे सामना जिंकला. त्यानंतर सर्वच स्तरामधून भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. त्यातच आनंद महिंद्रांनीही अगदी एका शब्दामध्ये भारतीय संघाचं अभिनंदन करणारं ट्विट केलं.

नक्की वाचा >> भारताने जिंकलेल्या सामन्यात के. एल. राहुल ठरला सामनावीर; सुनिल शेट्टी म्हणाला, “थोडा वेड्यासारखा…”

“मला जेव्हा जेव्हा Chutzpah हा शब्द वापरण्याची वेळ येथे तेव्हा फार आनंद होतो,” असं आनंद महिंद्रांनी म्हटलं आहे. Chutzpah या शब्दाचा उच्चार हॉट्स्पा असा होत असल्याचंही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. “या शब्दाचा अर्थ खूप आत्मविश्वास किंवा धैर्य असणं असा होतो,” असंही आनंद महिंद्रांनी पुढे म्हटलं आहे. तसेच ते म्हणतात, “या भारतीय संघामध्ये या गुणांची (खूप आत्मविश्वास आणि धैर्य) कमतरता नाही. सामन्यात आपण विजय खेचून आणू शकतो याबद्दल त्यांना स्वत:वर आणि स्वत:च्या क्षमतांवर विश्वास आहे,” असं नमूद केलं आहे. तसेच टाळ्या वाजवतानाचे इमोजीही त्यांनी या ट्विटमध्ये वापरलेत.

Tweet by Mahindra
दरम्यान, या सामन्यामध्ये शमीने कारकीर्दीतील झुंजार अर्धशतकी खेळी साकारताना जसप्रित बुमराच्या साथीने भारताला दुसऱ्या डावात ८ बाद २९८ अशा समाधानकारक धावसंख्येपर्यंत नेण्याचं काम केलं. उपाहारानंतर दुसऱ्याच षटकात कर्णधार विराट कोहलीने भारताचा डाव घोषित केला. मग गोलंदाजांनी ५१.५ षटकांत भारताचा लॉर्ड्सवर विजयाध्याय लिहिला.

Story img Loader