तमाम भारतीयांच्या नव्हे जगभरातील क्रिकेटरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं सर्वाचं लाडकं दैवत क्रिकेटमधून निवृत्त होतंय, या वृत्तानं गुरुवारी सर्वत्र खळबळ माजवली. परंतु या दैवताचं रिक्त झालेलं देऊळ एक फार मोठी पोकळी निर्माण करणार आहे. त्यामुळे आता भारतीय क्रिकेटला अर्थातच प्रतीक्षा आहे ती नव्या मास्टरची.
सुनील गावस्कर हा भारतीय क्रिकेटरसिकांनी डोक्यावर घेतलेला पहिला ध्रुवतारा. ‘लिटिल मास्टर’ या टोपणनावानं ओळखला जाणारा गावस्कर मुंबईचाच. गावस्करने १९८७मध्ये निवृत्ती पत्करली. त्यानंतर फक्त दोन वर्षांनी सचिनरूपी नवा तारा उदयाला आला. देशोदेशीच्या गोलदाजांना झगडायला लावणारा, सोबतच्या फलंदाजांना प्रेरणा देणारा सचिन पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत आपल्या कारकीर्दीतील २००वा सामना खेळणार आहे. हाच सामना त्याच्या कारकीर्दीचा अखेरचा सामना असणार आहे.
सचिनने १५ नोव्हेंबर १९८९ या दिवशी कसोटी पदार्पण केले. त्यानंतर तब्बल २४ वष्रे त्याने क्रिकेटवर राज्य केले. सुख-दु:खाचे अनेक चिरंतन क्षण त्याच्या खेळातून क्रिकेटरसिकांना मिळाले. त्यामुळे त्याची निवृत्ती भावनिक आणि चटका लावणारी आहे.
धावा, विक्रम यांचे अनेक एव्हरेस्ट सचिनने पादाक्रांत केले. त्यामुळे पुढील अनेक वष्रे त्याच्या खेळाचे विक्रम अन्य क्रिकेटपटूंना साद घालतील. त्यामुळेच सचिनच्या तोडीचा दुसरा खेळाडू पुन्हा कदापि जन्माला येणार नाही, असे क्रिकेटक्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
आकडय़ांच्या भाषेत सांगायचे झाले तर १९८ कसोटी सामने खेळलेल्या सचिनच्या खात्यावर ५३.८६च्या सरासरीने १५८३७ धावा जमा आहेत. समकालीन क्रिकेटमधील कोणीही क्रिकेटपटू त्याच्या आसपाससुद्धा नाही. प्रेरक हास्य, कुरळे केस, आदी वैशिष्टय़ जपणाऱ्या सचिनमध्ये क्रिकेटमधील अवर्णनीय ऊर्जा आणि गुणवत्ता सामावली होती. त्यामुळे सचिनच्या निवृत्तीचा निर्णय म्हणजे देव निवृत्त होतोय, ही भावना क्रिकेटरसिकांमध्ये आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा