आयपीएल २०२१ च्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला दिल्लीकडून पराभव पत्कारावा लागला. सुरेश रैनाची अर्धशतकी खेळी आणि सॅम करनच्या झटपट धावांमुळे चेन्नईने दिल्लीसमोर २० षटकात ७ बाद १८८ धावा उभारल्या होत्या. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्या दमदार खेळीमुळे दिल्लीने चेन्नईवर ७ गडी राखून विजय मिळवला. शिखर धवन आणि आणि पृथ्वी शॉ यांनी चेन्नईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने या पराभवासाठी गोलंदाजांना जबाबदार धरलं आहे.

‘मैदानात दव पडल्याने त्यावर सगळं अवलंबून होतं. फलंदाजी करताना आम्हाला ही बाब लक्षात आली होती. त्यामुळे आम्ही जास्त धावा करण्याची रणनिती आखली होती. फलंदाजांनी आपली भूमिका योग्यरित्या पार पाडली आणि १८८ धावसंख्या उभारली. सुरुवातीला फलंदाजांना समस्या आली मात्र दव पडल्यानंतर फलंदाजी करणं सोपं झालं. आम्ही आणखी चांगली गोलंदाजी करू शकलो असतो. गोलंदाजांनी योग्य पद्धतीने षटकं टाकली नाहीत. त्यामुळे धावा जास्त गेल्या. या पराभवातून आम्ही नक्कीच शिकलो आहोत.’, असं कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने सांगितलं.

IPL 2021: CSKच्या पराभवानंतर महेंद्रसिंह धोनीवर कारवाई

गोलंदाजांवर खापर फोडलं असलं तरी धोनी फलंदाजीत मात्र अपयशी ठरला. महेंद्रसिंह धोनीकडून चाहत्यांना मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा होती. धोनी फलंदाजीसाठी आला आणि २ चेंडू खेळत तंबूत परतला. अवेश खानच्या चेंडुवर त्रिफळाचीत झाला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही.

IPL 2021: SRH विरुद्ध KKR यांच्यात लढत; कोण मारणार बाजी?

आयपीएल २०२० मध्ये धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. आयपीएल २०२० पर्वात एकूण १४ पैकी ६ सामने जिंकता आले. तर ८ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या सुमार कामगिरीमुळे चेन्नईचा संघ मागच्या पर्वात सातव्या स्थानावर होता. संघाकडून यंदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मात्र असं असलं तरी धोनीची जादू चालत नसल्याने चिंता वाढली आहे