भारतीय महिला हॉकी संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत शानदार सुरुवात केली आहे. त्यांनी आपल्या पहिल्याच सामन्यात घानाचा ५-० असा पराभव केला आहे. भारताच्यावतीने गुरजीत कौरने सर्वाधिक दोन गोल केले. नेहा गोयल, संगीता कुमारी आणि सलीमा टेटे यांनी प्रत्येकी एक गोल केला.
आजच्या सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व ठेवले असले तरी अजूनही अनेक बाबींमध्ये संघ कमकुत दिसत आहे. गोलरक्षक सविता पुनिया खंबीरपणे उभी राहिली नसती तर, घानाचा संघ देखील चारपेक्षा जास्त गोल करू शकला असता. पेनल्टी कॉर्नरवर भारतीय खेळाडू कमकुवत दिसले. मिळालेल्या ११ पेनल्टी कॉर्नरमध्ये संघाला एकच गोल करता आला.
भारतीय महिला हॉकी संघ यावेळच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत १६ वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपवण्याचे ध्येय ठेवून मैदानात उतरला आहे. इंग्लंड, कॅनडा, वेल्स आणि घानासह भारत अ गटात आहे. भारतीय महिला हॉकी संघाला शनिवारी (३० जुलै) वेल्सविरुद्धच्या दुसरा साखळी सामना खेळायचा आहे.
भारतीय महिला हॉकी संघाने २००६ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत आपले शेवटचे पदक जिंकले होते. मेलबर्नमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर महिला हॉकी संघाला एकही पदक मिळालेले नाही. गोल्ड कोस्टमध्ये (२०१८), भारतीय संघ चौथ्या स्थानावर राहिला होता. नुकत्याच झालेल्या विश्वचषकातही भारत नवव्या स्थानावर होता. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतीय महिला चौथ्या स्थानावर राहिल्या होत्या. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढलेले आहे.