आंतराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने(आयसीसी) २०२३ सालापर्यंत पाकिस्तानात आंतराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट मालिकांचे आयोजन होणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार ‘मिसबा-उल-हक’ने या निर्णयावर दु:खी असल्याचे म्हटले आहे. तसेच मिसबाने याचा दोष पाकिस्तान संघाच्या सुरू असलेल्या खराब कामगिरीलाही दिला आहे.
“पाकिस्तानमध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेट मालिकांचे आयोजन केले जात नाही त्यामुळे संघाची आंतराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी ठासळली आहे यात काही शंका नाही. त्यात २०२३ पर्यंत पाकिस्तानात कोणतीही मोठी क्रिकेट मालिका होणार नाही या बातमीवर मी भरपूर दु:खी आहे” असे पाकिस्तान संघाचा कर्णधार मिसबा-उल-हकने स्पष्ट केले.
पाकिस्तानात २००९ साली शेवटची आंतराष्ट्रीय स्तरावरची क्रिकेट मालिका खेळविण्यात आली होती. श्रीलंका संघावर लाहोर येथे झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानात आतापर्यंत कोणतीही क्रिकेट मालिका घेण्यात आलेली नाही.