Duleep Trophy 2024 India A wins the Title: दुलीप ट्रॉफी २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यात, मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली भारत ए संघाने ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारत सी संघाचा १३२ धावांनी पराभव केला. या विजयासह भारत ए संघाने गुणतालिकेत पहिले स्थान मिळवून दुलीप ट्रॉफी २०२४ चे विजेतेपद पटकावले.

दुलीप ट्रॉफीच्या तीन सामन्यांपैकी भारत ए संघाने दोन सामने जिंकले होते आणि एक सामना गमावला होता. दोन विजयांसह या संघाचे सर्वाधिक १२ गुण झाले आणि या जोरावर हा संघ चॅम्पियन बनला. भारत सी ९ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. भारत ए संघाने ६१व्यांदा दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. या सामन्यात शाश्वत रावतची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

हेही वाचा – VIDEO: अफगाणिस्तानच्या फलंदाजाने स्वत:लाच केलं बाद; क्रिकेट इतिहासातला आश्चर्यकारक रनआऊट

दुलीप ट्रॉफी २०२४ च्या पहिल्या सामन्यात भारत ए संघाचे नेतृत्व शुबमन गिलने केले होते आणि या सामन्यात भारत ए चा भारत बी ने ७६ धावांनी पराभव केला होता. या सामन्यानंतर गिल बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी टीम इंडियात सामील झाला आणि संघाचे कर्णधारपद मयंक अग्रवालकडे सोपवण्यात आले. मयंकच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारत ए संघाने भारत डी संघाचा १८६ धावांनी पराभव केला तर तिसऱ्या सामन्यात भारत ए संघाने भारत सी संघाचा १३२ धावांनी पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

हेही वाचा – VIDEO: रोहित शर्माने आधी बेल्स बदलल्या, नंतर छू मंतर म्हणत असं काही केलं की दोन षटकांनंतर भारताला मिळाली विकेट

या सामन्यात शाश्वत रावतच्या १२४धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर आणि आवेश खानच्या नाबाद ५१ धावांच्या जोरावर भारत ए संघाने पहिल्या डावात २९७ धावा केल्या. यानंतर पहिल्या डावात अभिषेक पोरेलच्या ८२ धावांच्या जोरावर भारत सी संघाने २३४ धावा केल्या. पहिल्या डावात भारत ए संघाकडून आवेश खान आणि आकिब खान यांनी सर्वाधिक ३ विकेट घेतले.

हेही वाचा – IND vs BAN: “…म्हणून मी बांगलादेशची फिल्डिंग सेट केली”, ऋषभ पंतने अजय जडेजाचा उल्लेख करत दिलं मनं जिंकणारं उत्तर

पहिल्या डावाच्या आधारे भारत ए संघाला ६३ धावांची आघाडी मिळाली आणि त्यानंतर दुसऱ्या डावात भारत ए संघाने २८६ धावा केल्या आणि संघाची एकूण आघाडी ३४९ धावांची झाली. भारत ए संघाकडून दुसऱ्या डावात शाश्वत रावतने ५३ धावा केल्या. दुसऱ्या डावात भारत सी संघाला विजयासाठी ३५० धावांचे लक्ष्य मिळाले. पण साई सुदर्शनच्या १११ धावांच्या शतकानंतरही हा संघ २१७ धावांवर सर्वबाद झाला आणि सामना १३२ धावांनी गमवावा लागला. दुसऱ्या डावात भारत ए संघाकडून प्रसिध कृष्णा आणि तनुष कोटियन यांनी सर्वाधिक ३ विकेट घेतले. या सामन्यात इशान किशनची बॅट शांत होती आणि त्याने पहिल्या डावात ५ धावा आणि दुसऱ्या डावात १७ धावा तो करू शकला.

प्रसिद्ध कृष्णाने अखेरची विकेट घेत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. या विजयानंतर संघातील खेळाडू तिलक वर्मा, रियान पराग, तनुष कोटीयन, आवेश खान मैदानावरच नाचतानाचा व्हीडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये भारत सी संघाचा अंशुल कंबोज याने सर्वाधिक १६ विकेट घेतले तर भारत डी संघाचा खेळाडू रिकी भुईने सर्वाधिक ३५९ धावा केल्या आहेत.