कोईम्बतूर :गोलंदाजांच्या भरीव कामगिरीनंतर मुंबईकर पृथ्वी शॉने (नाबाद १०४) साकारलेल्या शतकामुळे पश्चिम विभागाने दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेत मध्य विभागाविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यावरील पकड मजबूत केली आहे.

पश्चिम विभागाच्या २५७ धावांचे प्रत्युत्तर देताना मध्य विभागाचा पहिला डाव १२८ धावांतच संपुष्टात आला. त्यामुळे पश्चिम विभागाला पहिल्या डावात १२९ धावांची आघाडी मिळाली. मग पुन्हा फलंदाजीला आलेल्या पश्चिम विभागाची दुसऱ्या दिवसअखेर २९ षटकांत ३ बाद १३० अशी धावसंख्या होती आणि त्यांच्याकडे एकूण २५९ धावांची आघाडी होती.

दुसऱ्या दिवशी ९ बाद २५२ धावांवरून पुढे खेळणाऱ्या पश्चिम विभागाचा पहिला डाव २५७ धावांत आटोपला. राहुल त्रिपाठीने ६७ धावांची खेळी केली. त्यानंतर मध्य विभागाला केवळ १२८ धावांची मजल मारता आली. पश्चिम विभागाकडून वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट (३/२४) आणि मुंबईकर फिरकीपटू तनुष कोटियन (३/१७) यांनी प्रभावी मारा केला.

पश्चिम विभागाच्या दुसऱ्या डावाची अडखळती सुरुवात झाली. यशस्वी जैस्वाल (३) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (१२) यांना दुसऱ्या डावातही मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्रिपाठी खातेही न उघडता बाद झाला. मात्र, गेल्या सामन्यातील शतकवीर पृथ्वीने आक्रमक शैलीत खेळताना ९६ चेंडूंत ११ चौकार आणि तीन षटकारांच्या साहाय्याने नाबाद १०४ धावांची खेळी केली. हे त्याचे प्रथम श्रेणी कारकीर्दीतील ११वे शतक ठरले. त्याला मुंबई संघातील सहकारी अरमान जाफरची (नाबाद ७) उत्तम साथ लाभली.

संक्षिप्त धावफलक

* पश्चिम विभाग (पहिला डाव) :

८५.४ षटकांत सर्वबाद २५७ (राहुल त्रिपाठी ६७; कुमार कार्तिकेय ५/६६)

* मध्य विभाग (पहिला डाव) :

४०.१ षटकांत सर्वबाद १२८ (करण शर्मा ३४; तनुष कोटियन ३/१७, जयदेव उनाडकट ३/२४)

* पश्चिम विभाग (दुसरा डाव) :

२९ षटकांत ३ बाद १३० (पृथ्वी शॉ नाबाद १०४, अजिंक्य रहाणे १२; अंकित राजपूत २/३३)

चिंतनच्या फेकीने वेंकटेशला दुखापत

पश्चिम विभागाचा मध्यम गती गोलंदाज चिंतन गाजाने फेकलेला चेंडू मध्य विभागाच्या वेंकटेश अय्यरच्या डोक्याला लागला आणि त्याला मैदानावरून नेण्यासाठी रुग्णवाहिकेला मैदानावर पाचारण करावे लागले. दुलीप चषक सामन्यादरम्यान हा प्रसंग घडला. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वेंकटेशने पहिल्या चेंडूवर चिंतनला षटकार ठोकला. दुसरा चेंडू त्याने फटकावला, पण चिंतनने तो अडवून पुढे आलेल्या वेंकटेशला धावबाद करण्यासाठी चेंडू परत फेकला. चेंडूपासून वाचण्यासाठी वेंकटेशने प्रयत्न केले. पण, चेंडू त्याच्या डोक्यावर आदळला आणि तो वेदनेने मैदानावर कोसळला. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून रुग्णवाहिका तातडीने मैदानावर नेण्यात आली. स्ट्रेचरही बाहेर काढण्यात आले. मात्र, वेंकटेशने त्याला नकार देत चालतच मैदानातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने त्याची दुखापत गंभीर नव्हती. वेंकटेश पुन्हा फलंदाजीस आला. पण, फारवेळ मैदानावर टिकू शकला नाही. वेंकटेश १४ धावांवर बाद झाला. त्यानंतर वेंकटेश क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला नाही.