पहिल्या विश्वविजयाने भारताला नवी दिशा दिली, असे मत विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी १९८३ च्या विश्वचषक विजयाला ३० वर्षे पूर्ण झाल्याप्रसंगी सांगितले. ‘‘मला वाटते की, १९८३ च्या विश्वविजयाने भारताला नवी दिशा दिली आणि भारतातील क्रीडा क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झाला. त्यावेळी एका युवा खेळाडूंची फळी माझ्याबरोबर होती. आम्ही तिथे क्रिकेटचा आनंद लुटायला गेलो होतो. वेस्ट इंडिजला पहिल्या सामन्यात पराभूत केल्यावर आमचा हुरूप वाढला आणि अंतिम फेरी आम्ही जिद्दीच्या जोरावर जिंकली,’’ असे कपिल म्हणाले.
या विषयी भारताचे माजी सलामीवीर सुनील गावस्कर म्हणाले की, विश्वविजय हा क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण होता. लॉर्ड्सवर जनसमुदायापुढे विश्वचषक उंचावला आणि अंगावर शहारे आले.