Adam Gilchrist has revealed the formula to defeat Team India in ODI World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेत भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली आहे. आतापर्यंतचे सर्व आठ सामने भारताने जिंकले आहेत. रोहित शर्माचा संघ १६ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्यामुळे अनेक क्रिकेट दिग्गजांना असेही वाटू लागले आहे की इतर संघांना भारतीय संघाला पराभूत करणे फार कठीण आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचे दिग्गज ॲडम गिलख्रिस्ट यांनी ऑस्ट्रेलियासह इतर संघांना भारताला हरवण्याचा ‘फॉर्म्युला’ सांगितला आहे.
इतर माजी खेळाडूंचे मत आहे की, भारतीय संघ केवळ तेव्हा स्पर्धेत पराभूत होऊ शकतो, जेव्हा ते एखाद्या दिवशी अत्यंत खराब कामगिरी करतील. सध्या या स्पर्धेत भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी अंतिम चारमध्ये स्थान मिळवले असून न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संघ शेवटच्या स्थानासाठीच्या शर्यतीत आहेत.
फॉक्स क्रिकेटशी बोलताना ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्ट म्हणाला, “माझ्या मते, नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करणे हा इतर संघांसाठी योग्य पर्याय आहे. मी असे म्हणत नाही कारण धावांचा पाठलाग करताना त्याच्यात काही कमकुवतपणा आहे. विराट कोहलीच्या रूपात त्यांच्याकडे धावांचा पाठलाग करताना उत्तम खेळाडू आहे, परंतु हे लक्षात ठेवले पाहिजे की भारतीय गोलंदाजी आक्रमणाने आतापर्यंत सर्वात जास्त नुकसान ‘अंडर लाईट’ म्हणजेच दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना केले आहे. सिराज, शमी आणि बुमराह हे दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना जवळजवळ ‘अनप्लेबल’ राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध दिवसा उजेडात फलंदाजी करणे अधिक योग्य ठरेल.”
ॲडम गिलख्रिस्ट पुढे सांगितले की, भारताला याची जाणीव आहे की देशांतर्गत परिस्थितीत ते फिरकी गोलंदाजीच्या प्रतिभेमध्ये विरोधी संघांना मागे टाकतात, परंतु जर त्यांना देशाबाहेर चांगली कामगिरी करायची असेल तर तयारी करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, एमआरएफ पेस अकादमी व्यतिरिक्त, डेनिस लिली आणि ग्लेन मॅकग्रा त्याच्यासाठी उपयुक्त राहिले आहेत. गिलख्रिस्टने ऑस्ट्रेलियासाठी ९६ कसोटी, २८७ एकदिवसीय आणि १३ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ४७.६० च्या सरासरीने ५५७० धावा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३५.८९च्या सरासरीने ९६१९ धावा आणि टी-२० मध्ये २२.६६ च्या सरासरीने २७२ धावा केल्या आहेत.