मुंबई : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रणजीपाठोपाठ इराणी चषकाचे जेतेपद पटकावणे हे मुंबई क्रिकेटसाठी खूप मोठे यश आहे. मुंबईला गेल्या काही वर्षांत अपेक्षित यश मिळत नव्हते. मात्र, आता युवा संघाला अजिंक्य रहाणेचे सक्षम नेतृत्व मिळाल्याने मुंबईने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुन्हा वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली आहे. मुंबईचा माजी क्रिकेटपटू म्हणून मला या गोष्टीचा खूप आनंद आहे, अशी भावना भारताचा माजी कसोटीपटू आणि १९९७ मध्ये इराणी चषक जिंकणाऱ्या मुंबई संघाचा सदस्य असलेल्या वसिम जाफरने व्यक्त केली.

मुंबईने आपली २७ वर्षांची प्रतीक्षा संपविताना १९९७ नंतर प्रथमच इराणी चषकाचे जेतेपद पटकावले. शेष भारताने फलंदाजीचे आमंत्रण दिल्यानंतर पहिल्या डावात मुंबईचा संघ ४ बाद १३९ असा अडचणीत होता. त्या वेळी कर्णधार रहाणे आणि सर्फराज खान यांनी केलेल्या शतकी भागीदारीमुळे सामन्याचे चित्र पालटले, असे जाफरला वाटते. तसेच सर्फराजचे द्विशतक आणि तनुष कोटियनच्या अष्टपैलू खेळाविना मुंबईला हा सामना जिंकणे शक्यच झाले नसते, असे मतही जाफरने मांडले.

हेही वाचा >>> पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत चुरस; महिला ट्वेन्टी२० विश्वचषकात आज भारत पाकिस्तान आमने-सामने

या लढतीदरम्यान सर्फराजने इराणी चषकात मुंबईसाठी द्विशतक करणारा पहिला फलंदाज ठरण्याचा मान मिळवला. जाफरने अशी कामगिरी विदर्भासाठी केली होती. त्यामुळे या खेळीचे मोल त्याला ठाऊक आहे. ‘‘इराणी चषकात अन्य राज्यांतील आघाडीच्या गोलंदाजांविरुद्ध द्विशतक करणे सोपे नाही. या लढतीपूर्वी सर्फराजचा भाऊ मुशीरचा अपघात झाला. त्यामुळे त्याचे कुटुंब अस्वस्थ असेल. सर्फराजच्या डोक्यातही बरेच विचार सुरू असतील. मात्र, त्यानंतरही मैदानावर इतक्या एकाग्रतेने खेळणे, हे फलंदाज म्हणून सर्फराजचे मोठेपण दाखवून देते,’’ असे जाफर म्हणाला.

रहाणेचे नेतृत्व अमूल्य

मुंबईच्या संघाला गेल्या काही वर्षांत मोठ्या स्पर्धांत जेतेपदाने हुलकावणी दिली होती. मात्र, अजिंक्य रहाणे कर्णधार झाल्यापासून हे चित्र पालटले. त्यामुळे रहाणेच्या नेतृत्वाचे जाफरने कौतुक केले. ‘‘कर्णधार म्हणून रहाणे किती खास आहे, हे आपण सर्वांनीच बॉर्डर-गावस्कर करंडकात (२०२०-२१) पाहिले होते. त्याला भारतीय संघाचे कर्णधारपद दीर्घकाळ भूषवण्याची संधी मिळाली नाही हे दुर्दैव. परंतु मुंबईसाठी त्याचे नेतृत्व अमूल्य ठरत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने मुश्ताक अली ट्वेन्टी-२०, रणजी करंडक आणि इराणी चषक अशा प्रतिष्ठेच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. मुंबईच्या खेळाडूंना रहाणेच्या मार्गदर्शनाचा निश्चितपणे फायदा होत आहे,’’ असे जाफर म्हणाला.

इराणी चषकात मुंबईला बराच काळ पराभवाचा सामना करावा लागत होता. मात्र, अखेर मुंबईने ही प्रतीक्षा संपवून खूप मोठे यश मिळवले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईने पुन्हा वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केल्याचे पाहून खूप आनंद होत आहे. मुंबईच्या यशात सर्फराज खान आणि तनुष कोटियनचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले. कोटियनने अशीच कामगिरी सुरू ठेवल्यास त्याच्यासाठी भारतीय कसोटी संघाची दारे लवकरच उघडू शकतील. मुंबई अडचणीत असताना मोक्याच्या क्षणी तो निर्णायक खेळी करतो. ही गोष्ट त्याला खूप पुढे घेऊन जाईल. – वसिम जाफर, माजी कसोटीपटू आणि मुंबईचा माजी कर्णधार.