Irfan Pathan Tweet viral: टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात ७ गडी राखून शानदार विजय नोंदवला. सूर्यकुमार यादवने ४४ चेंडूत ८३ धावांची वादळी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. मात्र, तो शतकापासून वंचित राहिला, पण त्याच्यानंतर तिलक वर्माने ३७ चेंडूत ४९ धावा आणि हार्दिक पांड्याने १५ चेंडूत २० धावा करत टीम इंडियाला दणदणीत विजय मिळवून दिला. यादरम्यान तिलक वर्माचे अर्धशतक हार्दिक पांड्यामुळे पूर्ण होऊ शकले नाही. यावर आता भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने सूचक ट्वीट केले आहे आणि सध्या ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
इरफान पठाणचे ट्वीट झाले व्हायरल
भारताचा कर्णधार हार्दिक पांड्याने १८व्या षटकातील पाचव्या चेंडूवर षटकार मारून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले, पण तिलकचे अर्धशतक हुकले. तिलक वर्माला अर्धशतक पूर्ण करू न दिल्याने हार्दिकला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. दरम्यान, माजी अनुभवी अष्टपैलू इरफान पठाणचे ट्वीट व्हायरल होत आहे. त्यात त्याने नाव न घेता हार्दिक पांड्याला टोमणा मारला आहे.
भारताची माजी स्विंग डावखुरा वेगवान गोलंदाज इरफान पठाणने बुधवारी एक ट्वीट केले आणि त्यात त्याने म्हटले की, “अवघड काम तुम्ही करा, मी सोपे काम करतो, हे कुठेतरी ऐकल्यासारखे वाटते.” हे वाक्य चाहते हार्दिक पांड्याच्या कृतीला जोडून पाहत आहे. अनुभवी अष्टपैलू खेळाडूने यापूर्वी दुसऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात युजवेंद्र चहलला षटकांचा कोटा पूर्ण करू न दिल्याबद्दल क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले होते.
चहलला गोलंदाजी न दिल्याने प्रश्न उपस्थित करण्यात आले
इरफानने ट्वीट करून म्हटले होते की, “युजवेंद्र चहलने दोन्ही सामन्यांमध्ये ४ षटकांचा कोटा पूर्ण केला नाही हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे.” इरफानशिवाय समालोचक आकाश चोप्रा आणि आरपी सिंग यांनीही हार्दिक पांड्याच्या निर्णयावर शंका उपस्थित केली आहे. दुसरीकडे इरफानने तिलक वर्माचे कौतुक केले. तो म्हणाला की, “डावखुरा फलंदाज हा मधल्या फळीत संघात नेहमीच असावा. त्यामुळे संघाला त्याचा फायदाच होतो. तिलक वर्माचे पहिले अर्धशतक मला टीम इंडियाच्या भविष्याच्या दिशेने पडलेले एक पाऊल वाटते.”
सामन्यात काय झाले?
४४ चेंडूंच्या खेळीत १० चौकार आणि चार षटकार मारण्याबरोबरच, सूर्यकुमारने टिळक वर्मासोबत तिसऱ्या विकेटसाठी ५१ चेंडूंत ८७ धावांची आक्रमक भागीदारी करत संघाला सामन्यात जिंकून दिले. तिलक वर्मा मात्र अर्धशतक करण्यापासून चुकला. वेस्ट इंडिज अजूनही मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे, मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेतील लॉडरहिल येथे खेळवले जातील.