काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या गौतम गंभीरने आपल्या अखेरच्या रणजी क्रिकेट सामन्यातही धडाकेबाज खेळी करत शतक झळकावलं आहे. आपल्या घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गौतम गंभीरने आंध्र प्रदेशविरुद्धच्या सामन्यात ११२ धावा पटकावल्या. या शतकी खेळीत ३७ वर्षीय गौतमने १० चौकार ठोकले. आंध्र प्रदेशने पहिल्या डावात ३९० धावा करुन दिल्लीला मोठं आव्हान दिलं होतं. मात्र गौतमने सलामीला फलंदाजीला येत या आव्हानाचा नेटाने सामना केला. गौतमच्या खेळीमुळे दिल्ली आंध्र प्रदेशवर पहिल्या डावात आघाडी घेणार हे आता जळपास निश्चीत झालं आहे.

दरम्यान पहिल्या डावात फलंदाजीसाठी मैदानात येत असताना सर्व खेळाडूंनी गौतमचा गार्ड ऑफ ऑनर देऊन सत्कार केला. गौतमचा हा अखेरचा रणजी क्रिकेट सामना असणार आहे. भारताला दोन विश्वचषक मिळवून देणाऱ्या गौतमने आपल्या रणजी क्रिकेट कारकिर्दीचा शेवटची तितक्याच शानदार पद्धतीने केला आहे.