टी २० वर्ल्डकपला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडिया नव्या जर्सीसह सज्ज आहे. भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोबरला प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. या स्पर्धेसाठी महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाचा मार्गदर्शक असणार आहे. या कामासाठी महेंद्रसिंह धोनीनं बीसीसीआयकडून एकही पैसा घेतलेला नाही. बीसीसीआयने धोनीपुढे मार्गदर्शकासाठी प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव तात्काळ धोनीने मान्य केला. महेंद्रसिंह धोनीच्या निवडीवर माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. महेंद्रसिंह धोनीचा एक सल्ला सामन्याच रुप पालटू शकते, असं मदनलाल यांनी सांगितलं आहे.
“मार्गदर्शक म्हणून महेंद्रसिंह धोनीची निवड करणे खरंच चांगली बाब आहे. त्याने हे देशासाठी केलं आहे. आता खूपच कमी खेळाडू आहेत. आता खेळाडू पैशांशिवाय बोलतच नाहीत. यासाठी मी धोनीचे धन्यवाद मानतो. त्याचा हा निर्णय योग्य आहे आणि बीसीसीआयने त्याला संधी दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मार्गदर्शक छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करतो. छोटी चूकही लक्षात आल्यानंतर सामन्याचं रुपडं पालटू शकतो. धोनीजवळ चांगला अनुभव आहे त्याचा संघाला नक्कीच फायदा होईल. त्याने कठीण प्रसंगात संघाचं नेतृत्व केलं आहे. त्याला माहिती आहे संघाला कशाप्रकारे हाताळायचं.”, असं मदन लाल यांनी इनसाइडस्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं.
T20 World Cup : टीम इंडियानं नवी जर्सी लाँच करताच रोहितवर खिळल्या नजरा; ‘ती’ कृती ठरलीय कौतुकास्पद!
टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर.
मार्गदर्शक: महेंद्रसिंह धोनी