Hardik Pandya getting emotional while playing the national anthem: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना गुरुवारी पार पडला. त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताचा ४ धावांनी पराभव झाला. आता या सामन्यातील हार्दिक पांड्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हार्दिक पांड्या राष्ट्रगीत सुरु असताना भावूक झाल्याचे दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टीम इंडियासाठी २०२२ च्या टी-२० वर्ल्ड कपपासून हार्दिक पांड्या या फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी पार पाडताना दिसत आहे. राष्ट्रगीत सुरू असताना हार्दिकच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. आता त्याचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. २०२४ साली होणार्‍या टी-२० विश्वचषकाला लक्षात घेता ही मालिका भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

पहिल्या टी-२० सामन्यातील पराभवानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, सामन्यात एके काळी आम्ही लक्ष्याचा पाठलाग खूप चांगल्या पद्धतीने करत होतो, पण आमच्याकडून काही चुका झाल्या आणि त्याचा फटका आम्हाला सहन करावा लागला. हा युवा संघ आहे आणि चुका होऊ शकतात.जर तुम्ही विकेट गमावल्या तर तुम्हाला लक्ष्य गाठणे कठीण होते. काही मोठे फटके नक्कीच सामन्याला कलाटणी देऊ शकतात. आम्ही काही विकेट लवकर गमावल्या ज्याची आम्हाला किंमत मोजावी लागली. यातून आपण धडा घ्यायला हवा. मालिकेत अजून ४ सामने बाकी आहेत.

हेही वाचा – IND vs WI 1st T20: ‘जेव्हा तुम्ही टी-२० सामन्यात सतत…’; हार्दिक पांड्याने पराभवानंतर व्यक्त केली निराशा

पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाची सुरुवात पराभवाने झाली. यजमान वेस्ट इंडिजने भारताला रोमहर्षक सामन्यात चार धावांनी पराभूत केले. विंडीजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या संघाने २० षटकांत ६ बाद १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला १५० धावांचे सोपे लक्ष्य गाठता आले नाही आणि २० षटकात ९ गडी गमावून १४५ धावाच करता आल्या. त्यामुळे वेस्ट इंडिजने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

या सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. नवोदित तिलक वर्मा वगळता सर्वांनी निराशा केली. तिलकने संघाकडून सर्वाधिक ३९ धावा केल्या. त्याच्याशिवाय एकाही फलंदाजाला ३० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. संथ विकेटवर, सेट झाल्यानंतर भारतीय फलंदाज बाद होत राहिले. याचा फटका संघाला सहन करावा लागला. सूर्यकुमार यादवने २१, कर्णधार हार्दिक पंड्याने १९, अक्षर पटेलने १३, संजू सॅमसन आणि अर्शदीप सिंगने १२-१२ धावा केल्या. इशान किशन सहा आणि शुबमन गिल तीन धावा करून बाद झाले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik pandya getting emotional while playing the national anthem before ind vs wi 1st t20 match vbm