Natasha Post After Hardik Pandya: टी २० विश्वचषक जिंकल्यावर भारतीय चाहत्यांचं व खेळाडूंचं सेलिब्रेशन तुफान व्हायरल होत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, बुमराह, सूर्या यांनी आपापल्या कुटुंबासह मैदानात व सोशल मीडियावर हा आनंद साजरा केला. पण या सगळ्यात भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी ओव्हर टाकणारा हार्दिक पंड्या मात्र अनेक फोटो व व्हिडीओज मध्ये एकटाच दिसत आहे. अर्थात कोट्यवधी भारतीय चाहत्यांची साथ व प्रेम त्याच्या जोडीला आहेच पण हार्दिकची बेटर हाफ म्हणजेच नताशा स्टॅनकोव्हिक हिने या विश्वचषक विजयावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. नताशा टी २० विश्वचषकासाठी बार्बाडोसमध्ये गेली तर नव्हतीच पण विजयानंतर तिने एकही पोस्ट किंवा स्टोरी सुद्धा शेअर केलेली नाही. हा पंड्या कुटुंबाचा खासगी प्रश्न असला तरी चाहत्यांना या प्रकारामुळे अनेक प्रश्न पडले आहेत. हार्दिक व नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चांना सुद्धा यामुळे उधाण आले आहे. या दरम्यान आज नताशाने पोस्ट केलेल्या रीलमधील एक मजकूर आणखीनच भुवया उंचावणारा आहे. नेमकी ही चर्चा कशाची होतेय, चला पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्हाला माहित असेलच की आज, ४ जुलै हार्दिक पंड्या सुद्धा टीम इंडियाच्या खेळाडूंसह मायदेशी परतला आहे. सर्वात आधी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर संपूर्ण टीम इंडिया मुंबईत दाखल होणार आहे. संध्याकाळी मुंबईच्या मरीन ड्राइव्ह वरून ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी रॅली निघणार आहे. अशातच आज नताशाने रील पोस्ट करून देवाकडे प्रार्थना केली आहे. देवा मी जेव्हा संकटात असते तेव्हा मला त्यातून बाहेर काढ आणि जेव्हा संकटात नसते तेव्हा माझं रक्षण कर अशा आशयाची ही रील आहे. ही प्रार्थना चांगल्यासाठीच केली असली तरी तिचा आता या क्षणी संदर्भ काय असा प्रश्न चाहत्यांना पडत आहे.

अगदी काहीच दिवसांपूर्वी नताशानी बायबलमधील एक वाक्य वाचतानाचा स्वतःचा व्हिडीओ सुद्धा शेअर केला होता. “मी आज एक अशी गोष्ट वाचली की ज्याची मला खरोखरच गरज होती. म्हणूनच हे बायबल मी माझ्याबरोबर कारमध्ये घेऊन आले जेणेकरून मला ते तुम्हाला सगळ्यांना वाचून ऐकवता येईल. तर हे वाक्य असं होतं की. ‘तुमच्याआधी, तुमच्यानंतर व तुमच्या बरोबर देवच कायम असणार आहे. तो तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही किंवा दूर करणार नाही. म्हणूनच तुम्ही कुठल्याही गोष्टीला घाबरू नका. आपण एखाद्या परिस्थितीत जेव्हा अडकून पडतो तेव्हा आपलं सगळं अवसान गाळून जातं, निराशा जाणवते, दुःख वाटून आपण सगळं काही गमावून बसलोय असं वाटतं, पण तेव्हा सुद्धा देव तुमच्याबरोबरच असतो. तुमच्याबाबत वाईट जरी घडत असलं तरी देवाकडे तुमच्यासाठी चांगलं घडण्याचे प्लॅन्स सुद्धा तयार असतात.”

हे ही वाचा<< रोहित, कोहली, बुमराह, द्रविडने १६ तासांच्या प्रवासात केलं काय? एकत्र प्रवास केलेल्या प्रतिनिधींनी शेअर केलेला खास अनुभव वाचा

नताशाच्या या प्रेरणादायी पण दुःखी पोस्टचा संबंध अनेकजण तिच्या व आणि हार्दिक पांड्याच्या नात्यात आलेल्या कटुतेशी जोडत आहेत. आयपीएलच्या दरम्यान नताशाने आपले लग्नाचे फोटो डिलीट केले होते. यातूनच घटस्फोटाच्या अफवा पसरल्या होत्या. काही दिवसांनी नताशाने ते फोटो रिस्टोअर केले तेव्हा लोकांनी असे कयास बांधले की, कदाचित आयपीएलच्या वेळी होत असलेलं ट्रोलिंग थांबवण्यासाठी व हार्दिकला सहानुभूती मिळवून देण्यासाठी तिने आधी फोटो डिलीट केले असावेत. पण आता पुन्हा टी २० विश्वचषकनंतर पुन्हा या चर्चांनी जोर धरला आहे. या जोडप्याने अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik pandya wife natasa shares cryptic video as team india returns amid divorce rumours why natasha says protect me viral video svs
First published on: 04-07-2024 at 17:20 IST